व्हीएस न्यूज - राहत्या घरात वायरने गळफास घेऊन एका दांम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या हत्या केली. ही घटना गुरूवारी दुपारी सव्वा तीन वाजता चऱ्होली येथे उघडकीस आली. विशेष म्हणजे हे दांम्पत्य पंधरा दिवसापुर्वीच चऱ्होली येथे राहण्यास आले होते.
उत्तम तुकाराम सुर्यवंशी (वय-37) व मुक्त सुर्यवंशी (वय-31, रा. भोसले वस्ती, चऱ्होली, मुळ. परभणी) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. सुर्यवंशी दांम्पत्याला 1 सात वर्षांची मुलगी व 6 वर्षांचा एक मुलगा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्यवंशी दांम्पत्य मुळचे परभणीचे असून 15 दिवसापुर्वीच चऱ्होली येथे राहण्यास आले होते. उत्तम सुर्यवंशी हे इलेक्ट्रेशियनची काम करत होते. गुरूवारी घरात कोणी नसताना सुर्यवंशी दांम्पत्याने वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना शेजाऱ्यांनी त्वरीत पालिकेच्या वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज ः पिंपरी-चिंचवडमधील एका आमदाराच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करत त्रिकुटाने त्याच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची चैन जबरदस्तीने तोडून नेली. हा प्रकार नुकताच पिंपळे-गुरव येथील काशिद पार्क येथे घडला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिsसच सुरक्षित नसलीत, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याप्रकरणी शैलेश काळभोर (वय-36, रा. पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळभोर हे पोलिस शिपाई असून शहरातील एका मातब्बर आमदाराचे ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
याबाबत फौजदार अ. बी. शेटे यांनी माहिती दिली. फिर्यादी काळभोर गुरूवारी त्यांच्या गावी लोणी काळभोरला गेले होते. गावावरून परत येताना पिंपळे-गुरव येथील काशिद पार्क येथे पाठीमागून आलेल्या एका स्कॉर्पिओ मधील त्रिकुटाने त्यांचा स्वीफ्ट डिझायर मोटारीला स्कॅार्पिओ अडवी लावून त्यांना अडविले. स्कॉर्पिओमधील त्रिकुटाने काळभोर यांना विनाकारण मारहाण करत त्यांच्या गळ्यातील 1 लाख 20 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारून जबरदस्तीने तोडून नेली. तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडून नुकसान केले. सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - ज्येष्ठ नागरिक संघ मेट्रोपॉलीटन, चिंचवड यांच्या वतीने इयत्ता 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
चिंचवडगाव येथे झालेल्या या सत्कार कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र कांकरीया, मोटार वाहन निरीक्षक शितल पवार, विठ्ठल भोईर, अनंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना फाईल फोल्डर, पेन, कॅलक्युटर, वही, मार्गदर्शन पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश जैन, मनद प्रसाद, श्रीकांत आंबेकर, संभाजी वाळके, प्रदिप पवार, कांतीलाल भंडारी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन खुशाल दुसाणे यांनी तर आभार शरद लुणावत यांनी मानले.
व्हीएस न्यूज - टॅंकरला एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात देहूरोड येथील सेंट्रल चौकात गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास एक टॅंकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. देहूरोड मधील सेंट्रल चौकाजवळ टॅंकर आला असता अचानक चौकात दुसरा ट्रक घुसला. अचानक समोर आलेल्या ट्रकमुळे टॅंकर चालकाचा टॅंकरवरील ताबा सुटला आणि टॅंकर समोरच्या ट्रकला मागच्या बाजूने धडकला. यामध्ये टॅंकरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक आणि क्लीनर दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अचानक आडवा आलेल्या ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला.
व्हीएस न्यूज - हॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्याने ट्रॅफिक वॉर्डनच्या मोटारीचा पाठलाग करून त्यांना शिवीगाळ करत मोटारीची तोडफोड केली. हा प्रकार थेरगाव मधील बापूजी बुवा कॉर्नरवर गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास झाला.
बालाजी किसन सगर (वय 38, रा. इंद्रायणी नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर उर्फ विनोद सातपुते (रा. गणराज कॉलनी, थेरगाव) याच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगर ट्राफिक वॉर्डन म्हणून वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते आपल्या मोटारीने घरी जात होते. त्यावेळी बापुजी बुवा कॉर्नरला रस्त्याच्या मधोमध सातपुते हा त्याच्या तीन मित्रांसोबत बोलत थांबला होता. रस्त्यावरून जाण्यासाठी सगर यांनी हॉर्न वाजविला. त्यावरून सातपुते आणि सगर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. सातपुते याने त्याच्या तीन मित्रांना घेऊन सगर यांच्या मोटारीचा पाठलाग केला. मोटारीवर दगडफेक करून मोटारीचे नुकसान केले. मोटारीवर दगडफेक झाल्याने सगर यांनी मोटारीतून पळ काढला. त्यामुळे ते बचावले. पोलिस हवालदार एस. एस. रासकर अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज ः कचरा डेपोवर कचरा वेचण्यासाठी गेलेली दोन मुले डेपोवर असलेल्या 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात पाय घसरून पडून दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपो येथे गुरूवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
इम्रान उर्फ सोनू रफिक शेख (वय 14) आणि अस्लम इस्माईल मुजावर (वय-16, दोघेही रा. वाकसई, मुळ गाव उदगीर) असे बुडालेल्या मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले एकमेकांची मावसभाऊ आहेत. सोनू याचे वडील रफिक शेख हे कचरा डेपोमध्ये कचरा उचलण्याच्या ठेक्यामध्ये काम करतात आणि डेपोच्या बाजूलाच असलेल्या वाकसई चाळ येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या मेव्हणीचा मुलगा असलेला अस्लम हा त्यांच्यासोबत लोणावळ्यात आला होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सोनू हा अस्लम याच्या सोबत कचरा डेपोमध्ये गेला होता. खड्याच्या जवळ गेल्याने दोघेही पास घसरून पाण्यात पडून त्यांचा बुडून मृत्यू झाला.
यातील इम्रान उर्फ सोनू याचा मृतदेह हा लगेच मिळून आला पण अस्लम याचा मृतदेह बराच वेळ सापडत नव्हता. अखेर अस्लम याला शोधण्यासाठी स्थानिक शिवदुर्ग मित्र या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी 3.40 वाजता अस्लम याचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गला यश आले. या मोहिमेत शिवदुर्गचे प्रविण देशमुख, अजय शेलार, सागर कुंभार, राजेंद्र कडु, आनंद गावडे, रोहित वर्तक, सागर पडवळ, दिनेश पवार, सुनिल गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
व्हीएस न्यूज - , ः ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळ्या जवळ आला आहे. या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांनी दिले.
आळंदी येथील प्रस्थान सोहळ्याचे आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रभारी तहसीलदार रवींद्र सबनीस, पालखी सोहळा समन्वयक उदयसिंह भोसले, समन्वयक तहसीलदार रुपाली सरनौबत, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त अजित कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वीज अभियंता सुभाष ढापसे, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका स्मिता रायकर, प्रतिभा गोगावले, सुनीता रंधवे, नगरसेवक सचिन गिलबिले, विभाग प्रमुख संघपाल गायकवाड, दत्तात्रय सोनटक्के, राजेश पवार, मंडलाधिकारी चेतन चासकर, शासकीय खात्याचे विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी समीर भूमकर या बैठकीस अनुपस्थित असल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. माउली मंदिरातून 6 जुलै रोजी दुपारी चारचे सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. या सोहळ्यात सुविधा उपलब्द करून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रांत प्रसाद यांनी विविध विभाग प्रमुख आणि शासकीय खात्याचे अधिकाऱ्यांना दिले. दिलेल्या नियोजनाचे प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे सूचना त्यांनी केल्या.
सोहळ्यात नागरी सुविधा, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षा यंत्रणा, दर्शन बारी, पोलीस बंदोबस्त, भाविक आणि नागरिक तसेच परिसराची सुरक्षा यावर लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितले. पाण्याचे टॅंकर, वाहन प्रवेश, पार्किंग, अतिक्रमण कारवाई, पादचारी मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पास शिवाय वाहनांना प्रवेश देऊ नये असे प्रांत प्रसाद यांनी सांगितले.
भाविकांसाठी केरोसीन आणि इंधन, गॅस पुरवठा पुरेशा प्रमाणात मिळेल याची दक्षता महसूल प्रशासनाने घेण्याचे आदेश देण्यात आले. मध्यवर्ती नियंत्रण कक्षात सर्व प्रकारची माहिती विभाग निहाय देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या 2 तारखेपर्यंत सर्व प्रकारची तयारी पूर्ण करून अंतिम आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पाणी नमुने आणि उघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच हॉटेल तपासणी करून दोषींवर कारवाईसाठी प्रस्ताव देण्याचे सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. रस्ते भाविक आणि नागरिकांना खुले राहतील याची दक्षता परिषदेने घेण्यास यावेळी त्यांनी आदेश दिले. यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. वीज पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता महावितरणने घेण्याचे आदेश देत संपर्क यंत्रणा सुरु राहील यासाठी त्यांनी सुनावले. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांच्यासह विविध अधिकारी, प्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांनी चर्चेत भाग घेतला. स्वच्छता गृहांची स्वच्छता, शहराची स्वच्छता, जंतुनाशके फवारणी, धुरीकरण यावर स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्य विभागाचे प्रमुख उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री शहरात असताना भाजपाच्याच नगरसेवकाचा भरदिवसा खून होत आहे, शहरातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काय झाले? असा खडा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. वाघेरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकालात सव्वा वर्षात 30 सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी 21 सभा तहकूब करण्याचा राष्ट्रीय विक्रम करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणाऱ्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा. अशीही मागणीही वाघेरे यांनी केली.
सर्व साधारण सभा तहकूब करणे आणि उपसूचना देण्याला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नेहमी विरोधच होता. अगदीच अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीच्या काळात सभा तहकूब केली जायची. परंतू शहरातील भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टक्केवारीच्या राजकारणातच जास्त रस असल्यामुळे सभा तहकूबीचा राष्ट्रीय विक्रम करणे शक्य झाले आहे. स्मार्ट सिटी व नदी सुधार प्रकल्पासाठी किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरीकांना मिळाली पाहिजेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकालात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता भाजपच्या काळात 43 व्या क्रमांकावर फेकले गेले असून सत्ताधाऱ्यांनी याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
व्हीएस न्यूज- 'पश्चिम बंगालला जाण्यासाठी तुम्हाला फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो,' असे सांगून दोघांनी एका तरूणाची 25 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार प्राधिकरण येथे नुकताच उघडकीस आला.
अभिजीत कुलकर्णी (वय-36, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांना मोबाईलव्दारे संपर्क साधून आरोपींनी फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो, असे सांगून खात्यावर 92 हजार रूपये भरण्यास भाग पाडले. आरोपींनी ट्रिपचे आयोजन केले नाही. त्यामुळे कुलकर्णी यांनी आरोपींकडे दिलेले पैसे मागितले. आरोपींनी 67 हजार रूपये दिले. परंतू, उर्वरित 25 हजार रूपये न देता फसवणूक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज- गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वृद्ध दांपत्य गंभीररीत्या भाजले आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. प्रभाकर नगरकर (वय 60) आणि आशा नगरकर (वय 58) अशी स्फोटात जखमी झालेल्या वृद्ध पती-पत्नीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगरकर पिंपळे गुरवमध्ये ओम साई सृष्टी चौकात एका चाळीवजा घरात राहतात. त्यांचे घर एकाच खोलीचे आहे. मंगळवारी रात्री स्वयंपाक झाल्यानंतर गॅस सुरूच राहिला. जेवण झाल्यानंतर दोघेही झोपले. मध्यरात्री प्रभाकर लघुशंकेसाठी उठले. दरम्यान, गॅस संपूर्ण घरात पसरला होता. त्यांना याबाबत कल्पना आली नाही. त्यांनी घरातील दिवा सुरू केला. त्यावेळी लिकेज झालेल्या गॅसचा स्फोट झाला. यामध्ये नगरकर दांपत्य गंभीररित्या भाजले.
घटनेची माहिती पावणेएकच्या सुमारास अग्निशमन विभागाला समजली. माहिती मिळताच तात्काळ वल्लभनगर अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. राहटणी अग्निशमन विभागाचे भाऊसाहेब धराडे, विकास नाईक, चिपळूणकर यांच्या पथकाने आग तात्काळ नियंत्रणात आणली. आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
व्हीएस न्यूज - पर्यटनाचे आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरण मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ओसांडून वाहू लागले. यामुळे धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद पर्यटक घेऊ लागले आहेत.
दोन आठवड्यापासून पर्यटकांना भुशी धरण भरण्याचे वेध लागले होते. धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखिल पर्यटन धरणावर गर्दी करत होते. शुक्रवारपासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने मंगळवारी अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायकांची प्रतिक्षा संपवली व पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओसांडून वाहू लागले. धरणाच्या सांडव्यावरुन पायऱ्यांवर पाणी वाहू लागले आहे.
मागील आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. धरणावर येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःच्या जिवाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - रस्त्यावरून विजेच्या खांबाजवळून जात असताना एका ९ वर्षीय बालकाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील ओटा स्कीम, निगडी येथे मंगळवारी (ता.२६) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.
हरीओम विनायक नराल – (वय ९, रा.पंचशील हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम हा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओटा स्कीम येथील अंकुश चौकातून रस्त्याने पायी चालला होता. तो विजेच्या खांबाजवळून जात असताना त्यास विजेचा जोरदार झटका लागला व तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित केला. मात्र त्यानंतरही या ठिकाणी विद्युत प्रवाह येत असल्याचे दिसून आले. यामुळे वीजचोरीतून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी व्यक्त केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002