व्हीएस न्यूज – भविष्याच्या दृष्टीने वाहतूक सेवेचे अद्ययावतीकरण, रहदारीच्या समस्या सोडविणे आणि पर्यावरण सुरक्षेत होणारी प्रगती यांसारख्या अनेकविध पैलूंचे प्रदर्शन 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स व एक्स्पोमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतीच हैद्राबाद शहरात या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. सदर प्रदर्शनामध्ये महामेट्रोच्या स्टॉलचे कौतुक झाले असून या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
शहरी भागातील मेट्रो प्रकल्पांबरोबरच त्यांच्याशी निगडीत इतर अनेक गोष्टींबद्दल माहिती देणा-या 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्स्पो आणि 17 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्सचे उद्घाटन यावेळी उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महामेट्रोचा स्टॉल या प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरला. भारत सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिव दुर्गा शंकर मिश्रा, तेलंगणा सरकारचे मुख्य सचिव एस. पी. सिंग, सीओडीएटीयुचे अध्यक्ष डॉमनिक बुसेरू, फ्रांसचे भारतातील राजदूत एम. अलेक्झांडर जिग्लर, केंद्र सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आदी यावेळी उपस्थित होते.
महामेट्रोतर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये मो बाईक, इलेक्ट्रिक वाहने यांबरोबर मेट्रो प्रकल्पादरम्यान पुरविण्यात येणा-या फीडर सर्व्हिसेस यांसारख्या प्रवासी सेवांची माहिती पुरविण्यात आली आहे. याशिवाय मेट्रो स्टेशन्स,नागरिकांशी साधण्यात येणारा संवाद, सोशल मिडीयाद्वारे होत असलेली जनजागृती, हरित उपकक्रम यांसारख्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन विकासाचे वैशिष्ट्य, नवीन कल्पनांचा प्रसार करणे, शहरी वाहतूक क्षेत्राच्या व्याप्तीचा शोध घेऊन नवनवीन पर्याय आणि त्याची कार्यप्रणाली सादर करणे आणि यातून परावर्तित होणाऱ्या सर्वोत्तम वाहतूक पर्यायाची अंमलबजावणी करणे असा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.
व्हीएस न्यूज - नाशिक जिल्हा पालक मंत्री यांनी दारू उत्पादनास महिलांची नावे द्यावीत, असे वक्तव्य करणारे नाशिक जिल्हा पालक मंत्री गिरीष महाजन यांच्या विरोधात शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका निकिता कदम, कविता खराडे, पल्लवी पांढरे, मिनाक्षी उंबरकर, अरुणा कुंभार, पुष्पा शेळके, सविता खराडे, पौर्णिमा पालेकर, शिला भोंडवे, संगीता जाधव, वर्षा शेडगे, मनिषा गटकळ, दिपाली देशमुख, सोनम पोटवडे, सविता धुमाळ, अश्विनी पोळ आदी उपस्थित होते.
गिरिष महाजन यांच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर म्हणाल्या की, नाशिक जिल्हा पालक मंत्री यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील महीलांची माफी मागावी अन्यथा याही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल. तसेच माजी नगरसेविका शकुंतला भाट यांनी देखील आक्रमकपणे आपले मत व्यक्त केले.
व्हीएस न्यूज – महापालिकेने बीआरटी अभ्यास करण्यासाठी नगरसेवक, अधिकारी यांचा अहमदाबाद दौरा करण्यात आला. या दौऱ्यावर झालेला खर्च संबंधित नगरसेवकांकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केलीआहे.
बीआरटीचा अहमदाबाद दौरा तीन टप्प्यात आयोजित केला होता. त्या दौऱ्यातून ऐनवेळी काही नगरसेवकांनी दांडी मारली. या नगरसेवकांचे विमानाचे तिकीट व राहण्याचा हॉटेलमधील रुम बुक केल्या होत्या. परंतु, सर्वसामान्य जनतेच्या कररुपाने गोळा झालेल्या पैशाचीउधळपट्टी सुरु आहे. या दौऱ्यातून काही फलनिष्पत्ती होणार आहे काय? तसेच दौऱ्यांचा अभ्यास अहवाल नगरसेवक देणार आहेत का, असा सवाल मनसेने केला असून त्यांचा सर्व खर्च नगरसेवकांकडून वसुल करावा, अशी मागणी राजू भालेराव यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज – भरधाव कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यु झाला. ही घटना आळंदी-मोशी रस्त्यावरील डुडळगाव येथे बुधवारी (दि. 1) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली.
सत्यभामा हनुमंत मुरकुट (वय 79, रा. डुडुळगाव ) असे मृत पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक संजीव नंदकिशोर शर्मा (वय 44, रा. चंदननगर, वडगाव शेरी) याच्यावर दिघी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यभामा या आळंदी-मोशी रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी संजीव शर्मा याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन, हयगयीने कार चालविल्याने सत्यभामा यांना कारची धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सत्यभामा यांचा मृत्यू झाला. दिघी ठाण्याचेपोलीस उपनिरीक्षक घिगे तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – ड्युटी लावण्याच्या कारणावरुन चिडलेल्या एका एसटी चालकाने वल्लभनगर बसस्थानकातील वाहतूक निरीक्षकास पट्टयाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.3) सायंकाळी साडे सहा वाजता वल्लभनगर बस स्थानकात घडली.
वाहतूक निरीक्षक हेमंत बंडोपंत खामकर (वय 42 रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बस चालक नारायण आण्णा सोनवणे (वय 38, रा. राजगुरुनगर, खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वल्लभनगर आगरात त्यांच्या कार्यालयात काम करतात. गेली दोन महिन्यांपासून ड्युटी लावण्यावरुन सोनवणे व खामकर यांच्यात वाद निर्माण झाला होता. शुक्रवारी याच कारणावरुन सोनवणे याने काहीही न बोलता त्याच्याहातातील बेल्टच्या बक्कलने खामकर यांना मारहाण केली. याप्रकरणी सोनवणेवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – नातेवाईकाला मारल्याच्या मोबदल्यात बीअरचा बॉक्स न दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि.4) सायंकाळी साडे चार वाजता रहाटणी येथील विक्रांत वाईन शॉपी जवळ घडली.
याप्रकरणी दादा शिंगे, अनिकेत पाटील, महेश बीराजदार व त्यांचा एक साथीदार यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी शिवकुमार पलकोंडे (वय 30 रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमारला त्याच्या गाडीची काच नातेवाईकाने फोडल्याचा संशय होता. या घटनेचा राग मनात धरुन त्याने त्याचे आरोपी मित्रांजवळ नातेवाईकांचा बदला घेण्याचे बोलून दाखवले. आरोपींनी संबंधीत नातेवाईकास मारहाण करुन त्याबदल्यात शिवकुमार याच्याकडे बीअरच्या बॉक्सची मागणी केली. मात्र शिवकुमारने बीअरचा बॉक्स न दिल्याने चिडून आरोपींनी, बॉक्स का देत नाहीस अशी विचारणा करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी शिवकुमार याच्या डाव्या खांद्यावर व डाव्या हातावर वार केलेतसेच भांडण सोडवणारे शिवकुमार यांचा मेहुणे तनिल गजलवाड यांनाही आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – दुचाकीवरुन ट्रीपल सीट जाणाऱ्या तीन तरुणांना भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक बसली. यामध्ये दोन तरुणांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.4) मोशी येथे रात्री साडेबारा वाजता घडली.
योगेश मारुती कडवे (वय 27 रा. जाधववाडी, चिखली) आणि गोविंद देवराव शेळके (वय 22 रा. जाधववाडी, चिखली) असे मयत तरुणांची नावे आहेत. तर संतोष अरुण डिडवळ (वय 23 रा. आदर्शनगर, मोशी) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आदिनाथलेंडगुळे (वय 22 रा. जाधववाडी) यांनी फिर्याद दिली आहे. योगेश, गोविंद व संतोष हे तिघे दुचाकीवरुन ट्रीपलसीट चुकीच्या दिशेने जात असताना समोरुन येणाऱ्या अज्ञात कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये योगेश आणि गोविंदचा जागीच मृत्यू झाला. तर संतोषडिडवळ हा गंभीर जखमी झाला.
व्हीएस न्यूज – मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची आवक 494 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 14 हजार 360 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 61 क्विंटलने घटली; तर पालेभाज्यांची आवक 7 हजार 753 गड्डयांनी वाढली.दिवाळीदरम्यान बाजारात फळभाज्यांची आवक मंदावली होती. आता परिस्थिती हळुहळू पुर्वपदावर येत असतानाच या आठवड्यात आवक मंदावली. मात्र, पालेभाज्यांची आवक अडीच पट वाढली. भाजीपाल्यांचे दर मात्र चांगेलच वधारले आहेत.
या आठवड्यात कांद्याची आवक 10 क्विंटलने घटून, सरासरी भावात 150 रुपयांची घट झाली. बटाट्याची आवक व भावहदेखील स्थिर राहिले. आल्याची आवक दोन क्विंटलने घटूनही भाव मात्र स्थिर राहिले. भेंडीची आवक दोन क्विंटलने वाढली असून, भावात 1000रुपयांची वाढ झाली. गवारीची आवक चार क्विंटलने घटूनही भाव 750 रुपयांनी वाधारले. टोमॅटोची आवक 19 क्विंटलने वाढली असून, भावात किरकोळ 100 रुपयांची वाढ झाली. मटारची आवक तीन क्विंटलने वाढूनही दर आठ हजार रुपयांवर पोचले. घेवड्याची आवक एकक्विंटलने वाढली असून, भाव 250 रुपयांनी वधारले. दोडक्याची आवक तीन क्विंटलने घटून भाव मात्र स्थिर राहिले.
मिरचीची आवक 10 क्विंटलने वाढली असून, भावात 500 रुपयांची घट झाली. दुधी भोपळ्याची आवक स्थिर राहूनही भाव 250 रुपयांनी घटले. काकडीची आवक आठ क्विंटलने घटूनही भावात 100 रुपयांची किरकोळ घट झाली. कारल्याची आवक दोन क्विंटलने घटलीअसून, भाव 250 रुपयांनी वधारले. फ्लॉवरची आवक 66 क्विंटलने वाढून भावात 600 रुपयांची वाढ झाली. कोबीची आवक 16 क्विंटलने वाढूनही भाव350 रुपयांनी वधारले. वांग्यांची आवक एक क्विंटलने घटली असून, भाव मात्र स्थिर राहिले.
व्हीएस न्यूज – अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा दोषी असतो. मराठा क्रांती मोर्चासाठी समाजाने एकत्रित यावे. एकजुटीच्या माध्यमातून पुढची पिढी नवीन इतिहास घडविण्याचे काम निर्माण होईल. तेच मोर्चाचे यश असेल, असे प्रतिपादन मावळचे आमदारसंजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचा 2 नोव्हेंबर स्मृतिदिन आणि 8 नोव्हेंबर जन्मदिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशनच्या वतीने देहूगाव येथील श्री शिवाजी चौकात प्रतिवर्ष व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. यंदाच्या 14व्या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प मराठा क्रांती मोर्चा-वाटचाल आणि दिशा या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे होते. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे नगरसेवक प्रवीण भालेकर, पिंपरी-चिंचवड पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी उपसभापती नाना शिवले, पुणे जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रशांत ढोरे, दिशा सोशल फांऊडेशनचे सचिन साठे, व्याख्यानमाला समितीचे राजेंद्र घावटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाचे राजकीय समीक्षक प्रा. डॉ. प्रकाश पवार, शिलेदार प्रवीण गायकवाड, विकास पासलकर, राजेंद्र कोंढरे यांनी छावा संघटनेचे समन्वयक आबा पाटील, फांऊडेशनचे प्रा. प्रवीण कदम, प्रा. सुनील भसे आणि उपस्थित श्रोत्याच्या प्रश्नांची उत्तरे देतपरिसंवाद साधला. आमदार भेगडे यांनी या व्याख्यानमालेला पूर्णवेळ देत परिसंवादात सहभाग घेतला. आमदार भेगडे यांना मोर्चाच्या सार्थकाबाबत परिसंवादामध्ये प्रश्न विचारले असता ते म्हणाले.अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा दोषी असतो. 30 वर्षाचीतपश्चार्या सहन करीत आलो आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने जनमाणसांत एक मोठी प्रतीमा निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात आपण सकारात्मक दृष्टीतून पाहू.
आरक्षण किंवा विविध सवलतीचा प्रश्न असेल. मराठा समाजाने एकत्रित यावे. एकजुटीच्या माध्यमातून पुढची पिढी नवीन इतिहास घडविण्याचे काम निर्माण होईल. तेच मोर्चाचे यश असेल, असे प्रतिपादन आमदार भेगडे यांनी व्यक्त केले. दरम्यान लेखक नामेदव पवारयांच्या “मराठी क्रांती मोर्चा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम यांनी केले. संदीप शिंदे यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा धुव्वा उडवणारे शहराच्या राजकारणातील “पैलवान’ आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.दुसरीकडे, मावळचा “गड’ तीनदा राखून तब्बल 30 वर्षे भाजपशी निष्ठावंत असलेल्या आमदार बाळा भेगडे यांनीही मंत्रीपदासाठी बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपदाचे एक “फुल’ त्यावर दावा करणारे “तीन माली’ अशीस्थिती निर्माण झाली आहे. मंत्रिपदाचे हे फुल आता कुण्याच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाचे “गाजर’ दाखवले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपसोबत गेले आहेत. राणेयांना राज्यात मंत्री करण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मावळात वेगवेगळ्या दोन कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी तावडे आणि उपाध्ये यांनीही आमदार भेगडे यांच्या मंत्रिपदाबाबतनमोल्लेख केला. परिणामी, पिंपरी-चिंचवडमधील मंत्रिपदाचे स्वप्न भंगणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका काबीज करण्यात भाजपला यश मिळाले. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्ष बाकी आहे. त्यातच डिसेंबर2018 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आमदार जगताप किंवा लांडगे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभाआणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला चांगले यश मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे जिल्हयात विजयी घोडदौड करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पिछेहाट झाली आहे. जिल्ह्यात केवळ9 ठिकाणी भाजपचा सरपंच झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आजही राष्ट्रवादी, कॉंग्रेसची पाळेमुळे घट्ट आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला पुणे जिल्हा आणि पर्यायाने राज्यातप्रभावी ठरेल, अशा चेहऱ्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणि राज्यात प्रभावशाली ठरेल, अशा आमदारला मंत्रिपदाची संधी देण्यात येईल. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत जगताप, लांडगे आणि भेगडे यांच्यापैकी कुणाची वर्णीलागणार की, मंत्रिपदाच्या केवळ वावड्या ठरणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मंत्रिपदासाठी दावेदारांची बलस्थाने :
1) आमदार लक्ष्मण जगताप :
– महापालिका निवडणुकीतील विजय
– पिंपरी-चिंचवडचा शहराध्यक्ष म्हणून प्रभावी नेता
– मावळ लोकसभा मतदार संघात मोठा संपर्क
– पवार कुटुंबियांविरोधात थेट बोलण्याची धमक
– पश्चिम महाराष्ट्रातील सक्षम मराठा नेता
– आगामी निवडणुकांसाठी भाजपचा सक्षम चेहरा
– कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळण्याची अपेक्षा
2) आमदार महेश लांडगे :
– पश्चिम महाष्ट्रातील प्रभावी युवा चेहरा
– बैलगाडा शर्यतीच्या लढ्यामुळे राज्यात परिचित
– आळंदी, खेड, जुन्नरमधील विजयात सिंहाचा वाटा
– पालिका निवडणुकीत भोसरीतून शिवसेना-राष्ट्रवादीचा धुव्वा
– राज्य क्रीडा संघटनांच्या महत्त्वांच्या पदांवर कार्यरत
– “मोदी लाटेत’ अपक्ष मैदान मारणारा आमदार
– मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी सलोख्याचे संबंध
– राज्य क्रीडा मंत्रीपदी संधी मिळण्याची अपेक्षा
3) आमदार बाळा भेगडे :
– मावळला भाजपचा बालेकिल्ला केला
– सलग तीनदा भाजपचा आमदार
– जिल्हाध्यक्ष म्हणून ग्रामीण भागात संपर्क
– भाजपचा निष्ठावंत आमदार म्हणून ओळख
– मावळ तालुक्यातील संयमी नेतृत्व
– पक्ष संघटनेत महत्त्वाचे पद, ग्रामीण चेहरा
– ग्रामीण भागाशी संबंधित मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका हद्दीतील जमिनीवरील सर्व वृक्षांची गणना करण्यात येणार आहे. वृक्षांची सॅटेलाईटद्वारे गणना कामास 6 कोटी 46 लाख 83 हजार 814 रुपये खर्चास स्थायी समितीने 27 सप्टेंबर 2017 मान्यता दिली, मात्र अधिकाऱ्यांनी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष दाखवून या रकमेत 29 लाख 58 हजार 904 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे वृक्ष गणनेचा एकूण खर्च 6 कोटी 76 लाख 42 हजार 718 रुपये होणारआहे. हा विषय स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व जमिनीवरील वृक्षांची गणना करणार आहे, जीआयएस, ईमेज सर्व्हर ऍप्लिकेशनद्वारे ही गणना होणार आहे. या वृक्ष गणनेला दोन वर्षे अवधी लागणार आहे. तर तीन वर्षेकालावधीत वृक्षांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी टेराकॉन इकोटेक प्रा. लि. संस्थेला 6 कोटी 46 लाख 83 हजार 814 रुपये खर्चाने ठेका देण्यास स्थायी समितीने 27 सप्टेंबरला मंजुरी दिली होती.
दरम्यान, सॉफ्टवेअरचे तांत्रिक दोषामुळे निविदेतील रक्कम फक्त एकाच नगाप्रमाणे दर दर्शविल्यामुळे निविदेच्या प्रत्यक्ष दरामध्ये 29 लाख 58 हजार 904 रुपये इतका फरक प्रत्यक्ष दिसून आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सदरील रकमेत वाढ करून एकूण 6 कोटी 76 लाख 42 हजार 718 रुपये खर्चास मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार दर पाच वर्षांनी वृक्ष गणना करणे बंधनकारक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने या आदेशाला हरताळ फासला आहे. 2004 नंतर अद्याप वृक्षगणना झालेली नाही. कागदोपत्री घोडे आणिनिविदा प्रक्रियेमध्येच शहरातील वृक्षांची गणना अडकली आहे. तब्बल तेरा वर्षांनी वृक्ष गणनेला मृहूर्त लागत असला तरी त्यालाही वाढीव खर्चाचे ग्रहण लागले आहे. 29 लाख 58 हजार रुपये महापालिकेला जादा मोजावे लागणारअसल्याने करदाते संताप व्यक्त करत आहेत.
व्हीएस न्यूज - टेलिनॉर इंडियातर्फे आपल्या महाराष्ट्र व गोव्यातील ग्राहकांसाठी नवीन अनलिमिटेड प्लॅन सादर करण्यात आला आहे. एसटीव्ही 143 यामध्ये अनेक वैशिष्टये असून त्यामध्ये अमर्याद लोकल व एसटीडी कॉल्स व 28दिवसांच्या वैधतेसह सर्व हॅंडसेटकरिता 2 जीबी हायस्पीड डेटा सेवा यांचा समावेश आहे. या योजनेमुळे टेलिनॉरच्या ग्राहकांना कॉल रेटची चिंता न करता आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहता येणार आहे.
यावेळी बोलताना टेलिनॉरचे महाराष्ट्र व गोवा परिमंडलाचे व्यवसाय प्रमुख सुक्रीत मैत्रे म्हणाले की, ग्राहकांना किफायतशीर दरात उत्पादने उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असतो. आमच्या नव्या एसटीव्ही 143 या प्लॅनमुळे व्हॉइस आणि डाटाचे सर्वोत्तम फायदे ग्राहकांना मिळणार आहेत. ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा देण्यासाठी टेलिनॉर कटिबद्ध आहे. ग्राहकांना नव्या ऑफर्सचा लाभ नजीकच्या रिटेल आउटलेटमध्ये किंवा टेलिनॉर इंडियाच्या वेबसाईटद्वारे ऑनलाइन रिचार्ज करून घेता येईल. एसटीव्ही 143 हा प्लॅन टेलिनॉर इंडियाच्या मोबाईल ऍपवर उपलब्ध आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002