व्हीएस न्यूज – घरे नियमितीकरणासाठी नवनगर विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी, शर्तीं आणि खर्च नागरिकांना परवडणारा नाही. त्यामुळे रिंगरोडबाधित व प्राधिकरणातील करांचा प्रश्न जैसे थे राहणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या अटी-शर्तीं विरोधात लढा उभारण्याचा इशारा रिंगरोड बाधितांच्या स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने दिला आहे.
शासनाच्या निर्णयात व प्राधिकरणाच्या धोरणात आर्थिक दुर्बल घटकांचा विचार केलेला नाही. अर्धा, एक गुंठ्यासाठी अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी चारपट दंडासह उपकर, विकासशुल्क, सुरक्षा ठेव, बांधकाम स्क्रुटिनी,पसेज, आर्किटेक्चर खर्च, मोजणी शुल्क अशा प्रकारचे दंड भरावे लागणार आहेत. त्याचा खर्च लाखो रुपयांमध्ये जाणार असून ते सर्वसामान्य कुटुंबांना मुळीच परवडणारे नाहीत. संपूर्ण शास्तिकर भरल्याशिवाय बाधितांना नियमितीकरनाचा अर्जही करता येणार नाही. त्यामुळे शास्तीकराच्या विरोधात ज्यांनी सत्तेत येण्यासाठी रान पेटवले, तेच बाधितांच्या गळ्यातील शास्तीचा फास आवळत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.
रिंगरोड बाधितांच्या घरासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. न्याय मिळणार नसेल, तर आणखी लढा तिव्र केला जाईल. पुढील चार दिवसांत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला समन्वयक राजश्री शिरवळकर, प्रतिभा कांबळे, नयना नारखेडे, भाग्यश्री सावंत, अर्चना मेंगडे, सुनिता फुले, सुरेखा बहिरट, मनीषा घाडगे, चंद्रकला नवाडे, ज्योती वायकर, विद्या पाटील, संगीता सोनावणे, धनाजी येळकर,मनोहर अण्णा पवार, विशाल पवार, प्रशांत सपकाळ, राजेंद्र देवकर, अमोल पाटील, शिवाजी पाटील, अतुल वर्पे, दत्ता चिंचवडे, देवेंद्र भदाणे, मनोज पाटील, सुदर्शन भराटे, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, गणेश सरकटे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – प्रवासादरम्यान महिलेकडील अडीच लाखाचे दागिने ठेवलेली पिशवी चार महिला चोरट्यांनी लांबविली. ही घटना मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावर वाकड ते लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज दरम्यान घडली.
शोभा उत्तम आढाव (वय 53, रा. सेंट्रल रेल्वे कॉलनी, सायन, मुंबई) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शोभा आढाव या शनिवारी पतीसमवेत द्रूतगती मार्गाने वाकडहून मुंबईकडे खासगी वाहनातून जात होत्या. त्याच गाडीमध्ये असलेल्या 20 ते 40 वयोगटातील महिलांनी हातचलाखी करत आढाव यांची पिशवी लंपास केली. त्यामध्ये सोन्याच्या तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या चेन, दोन पेंडल, दीड तोळे वजनाची साखळी, ब्रेसलेट, आठ सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याची व दोन मोत्याच्या नथ असा सुमारे 2 लाख 59 हजारांचा ऐवज चोरून नेला. लोणावळा ग्रामीणच्या सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान निगडी प्राधिकरणात घडली.
सुजित सुभाष डागा (वय 23, रा. डागा रेसिडेन्सी, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता डागा हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. सायंकाळी साडेपाच वाजता ते घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातील अडीच लाखाची रोकड आणि 10 तोळे सोन्याचे दागिने असा 6 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत ऐन थंडीत पावसाची रिमझिम पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळाली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने थंडीत पावसाळी वातावरण तयार झाले.
मागील दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होते. याचीच प्रचिती पावसाच्या स्वरूपात वरूण राजाने लावलेल्या हजेरीने दिसून आली. त्यामुळे वातावरणातही चांगलाच बदल झाला. पिंपरी,चिंचवड, आकुर्डी, रावेत, निगडी, प्राधिकरण भागासह पुणे आणि मावळमधील काही भागात सोमवारी दुपारनंतर पावसाने अचानक हजेरी लावली. भर हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये पावसाचीच चर्चा रंगली. अचानक आलेल्या पावसाने वाहतुकीचा थोडा खोळंबा झाला. ऐन हिवाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य होत आहे.
सलग तीन ते चार तास पावसाची रिमझिम सुरू होती. सायंकाळी कार्यालयीन कामकाज सुटण्याच्यावेळी देखील पाऊस सुरू राहिल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे तापमानातही चांगलाच मोठा बदल दिसून आला. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस पहायला मिळाले. तीन आठवड्यानंतर तापमानाने दोन दिवसात उच्चांक गाठला.
हवामान खात्याने देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली होती ती खरी ठरली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या रविवार (दि. 26) पर्यंत हवामान ढगाळ राहण्याचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज – देशात 500 व 1000 रुपये चलनात बंद केल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने ठिकठिकाणी मृत्युमुखी झालेल्या नागरिकांना देहूरोड येथे रविवारी (दि. 19) सायंकाळी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
देहूरोड मेन बाजार पेठेतील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात रविवारी सायंकाळी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने नोटबंदी काळात मृत झालेल्या नागरीकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे, मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, ऍड. बालाजी गायकवाड, वैशाली अवघडे, अवघडे, विजय मोरे, पंकज तंतरपाळे, किरण कांबळे, मेजराज तंतरपाळे, रमेश पवार, मेनु शेख, पत्रकार उमेश ओव्हाळ, रामकुमार आगरवाल, देवराम भेगडे, संजय धुतडमल आदी यावेळी उपस्थित होते.
देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनात सुरू असलेले 500 व 1000 रुपयाच्या नोटा सरकारने बंद केले. जुन्या बंद केलेल्या नोटा बॅंकेत जमा करण्यास 30 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत नागरिकांना देण्यात आली. तारांबळ उडालेल्या गरीब नागरीकांनी 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान बॅंकेत रक्कम भरणा करताना, काढताना लावलेल्या रांगेत, पैशांच्या अभावामुळे, भुकेमुळे, दवाखान्यात, रुग्णालयाच्या उपचारापोटी, ताण-तणाव अशा वेगवेगळ्या कारणाने देशभरात ठिक-ठिकाणी सुमारे 125 हून अधिक नागरीक मृत्युमुखी पडले. या नागरिकांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उपस्थितांनी मेणबत्ती पेटवून मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
व्हीएस न्यूज - महाकाली टोळीतील एका सराईत गुन्हेगारास सोमवारी पाच पिस्टल व 15 जिवंत काडतुसासह हिंजवडी पोलिसांनी अटक केली. सागर कुमार इंद्रा (वय 23 रा. थेरगाव), असे अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला हिंजवडी येथील स्पाईन रोडवरून अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जबरी चोरीचा तपास करत असताना पोलीस कर्मचारी विवेक गायकवाड यांना खब-याद्वारे खबर मिळाली की, सागर हा शस्त्रासह स्पाईन रोडवरील आशिर्वाद हॉटेल समोर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आज दुपारी चार वाजता सागरला ताब्यात घेतले.
यावेळी त्याच्या ताब्यातील कार (एमएच 04 ई.टी.1002) मधून त्याने चार पिस्टल व 13 काडतुसे विक्रीसाठी आणली होती. तसेच त्याच्या कंबरेला एक पिस्टल त्यात दोन जिवंत काडतुसे असे पाच गावठी पिस्टल व 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच त्याच्या ताब्यातील पोलो कार, असा एकूण 6 लाख 26 हजार 550 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
सागर याच्यावर फरसखाना, हिंजवडी, देहूरोड, चिंचवड, निगडी या पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच तो महाकाली टोळीचा सक्रीय सदस्य आहे. महाकाली टोळी ही निगडी, आकुर्डी, रावेत, देहूरोड या परिसरात दरोडा, खून चोरी, दहशत पसरविण्याचे काम करते. सागर हा याच टोळीचा सक्रीय सदस्य आहे. त्यामुळे पोलीसही खूप दिवसांपासून सागर याच्या मागावरच होते.
ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे गणेश धामणे, कर्मचारी विवेक गायकवाड, किरण लांडगे, आनंद खोमणे, संदीप होळकर, अशिष बेटके, अतिक शेख, ज्ञानेश्वर मुळे व आण्णा गायकवाड यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज – शहरातील आकुर्डी परिसरात दहशत माजविणाऱ्या रावण सेना टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव (वय 22, रा. रावेत) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. शितळादेवी मंदिर परिसरात सोमवारीमध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
मागील काही दिवसांपासून आकुर्डी परिसरात रावण सेनेची दहशत आहे. अनिकेत हा त्या टोळीचा म्होरक्या होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वी महाकाली टोळीचा म्होरक्या हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात तो फरार होता. दरम्यान, टोळी वर्चस्वातून अनिकेतचा खून झाल्याचा प्राथमिकअंदाज पोलिसांनी वर्तविला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
दापोडी येथील हॅरिस ब्रिजवरून ८ महिन्याच्या बाळासह उडी घेत महिलेने आज सायंकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली.
व्हीएस न्यूज - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापुरी असलम शेख (वय २०, रा. वाकड), असे महिलेचे नाव असून अग्निशामक दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला असून बाळाचा शोध सुरू आहे. घटनास्थळी औंध अग्निशामक दलाची गाडी असून जवान बाळाचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका विधी समितीच्या सभेमध्ये अजेंड्यावरील विषय तहकूब करून ऐनवेळचे विषय मंजूर केले जात आहेत. ऐनवेळचे विषय घेण्यामध्ये ‘विधी’चे सभापती राजकारण करत आहेत. त्यामुळे यापुढे ‘विधी’, स्थायी समितीसह कोणत्याही विषय समितीत एकही ऐनवेळचा विषय घेऊ नयेत. अन्यथा या विरोधात न्यायालयात जाऊ, आंदोलने करु असा, इशारा शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कलाटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत अजेंड्यावर असलेले दोन विषय तहकूब करण्यात आले. तर, ऐनवेळचे सहा विषय सभेसमोर ठेवण्यात आले होते. परंतु, सहा विषयांपैकी विधी समितीने पाच ऐनवेळचे विषय मंजूर केले. तर, एकच विषय जाणीवपूर्वक वगळण्यात आला. विधी समितीच्या सभापती हे जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येते, असे कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
ऐनवेळचे विषय मंजूर करायचे असतील तर सर्व सदस्यांचे विषय घेणे अपेक्षित होते. ऐनवेळचे विषय मंजूर करायचे नव्हते तर कुठलाच विषय मंजूर करायचा नव्हता. वाकड येथील स्थळ बदलचा विषय प्रशासनामार्फत आला होता. त्यामुळे या विषयाला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते असे कलाटे यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – हिंजवडीतील नामांकीत आयटी कंपनीत कामाला लावण्याच्या बहाण्याने 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना पिंपळे निलख येथे घडली.
राजीव ऊर्फ समीतकुमार संभुनाथ सिंग (श्रीमणी इस्टेट, भूमकर चौक, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी विवेक शुक्ला (वय 29, रा. भूमकर चौक) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. विवेक यांच्या पत्नीला हिंजवडीतील नामांकीत आयटी कंपनीत कामाला लावण्यासाठी सिंग याने वेळोवेळी आपल्या खात्यात ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करुन घेतले. मात्र, नोकरीला लावत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विवेक यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करत आहेत.
पवना हॉस्पिटलमध्ये रि-प्लांटेशन शस्त्रक्रिया यशस्वी
व्हीएस न्यूज – डॉक्टर देव नाही; परंतु देवापेक्षा कमी नाही, याचा प्रत्यय सोमाटणे येथे पवना हॉस्पिटलमध्ये आला. येथील डॉक्टरांनी चक्क धडापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात याची चर्चा आहे.
मोनजिन शेख नामक एक वीस वर्षीय तरुण सोमाटणे येथे कामाकरिता आला असता त्याला काही दिवस होत नाहीत की दुर्दैव त्याला आडवे आले आणि काम करत असताना सिमेंट मिक्सरमध्ये अडकून त्याचा उजवा हात खांद्यापासून तुटून बाजुला पडला. त्याला त्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी लगेच तो हात पुन्हा जोडण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे 12 तासांच्या अथक् प्रयत्नानंतर तो हात पुन्हा जोडण्यात आला आणि विशेष म्हणजे ही शत्रक्रिया यशस्वीही झाली. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सत्यजीत वाढोकर आणि डॉ. वर्षा वाढोकर यांनी उपचाराच्या खर्चाचा विचार न करता पेशंटवर तातडीने उपचार केले.
एका खोलीत या पेशंटला स्टॅबिलाईज करून त्याचे प्राण वाचवण्याचे व शरीरापासून पूर्णत: वेगळ्या झालेल्या हातावर दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये हातास पुन: प्रत्यारोपणासाठी सजीव ठेवण्याचे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. केस “हाय रिस्क सर्जरी’ ची असल्याने आणि सहा तासांच्या आत हात पुन्हा जोडण्याचाच अवधी असल्याने प्लॅस्टिक सर्जन डॉ. संदीप नाफडे आणि ऑर्थोपिडीशियन डॉ. प्रवीण वाघमारे यांनी या रिस्कचे आव्हान स्वीकारले. सुमारे दीड-दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पेशंट ऑपरेशनसाठी फीट करण्यात त्यांना यश आले आणि त्यानंतर ऑपरेशन सुरू झाले. डॉक्टर्स आणि स्टाफने सलग दहा तास शस्त्रक्रियेत व्यस्त राहून हे आव्हान पेलले. मंगळवार दि. 14मोनजिनला डिस्चार्ज देताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद त्याला लपवता आला नाही. या वेळी पत्रकारांशीही त्याने संवाद साधला. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही समाधान होते.
आर्थिक मदत गरजेची होती…
तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सांगितले की, तो कोठून आला, त्याचे नाव काय, याचे मला काही देणे-घेण नाही. त्याला त्या वेळी आर्थिक मदतीची गरज होती आणि मी ती केली. मावळ तालुक्यातील कोणालाही वैद्यकीय मदत करण्यासाठी मी कधीही तत्पर आहे. मी केलेल्या मदतीपेक्षा त्याला हात परत मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कित्येक लाख मोजून मिळणार नाही. यावरून सुनील शेळके यांची समाजाप्रती निष्ठा लक्षात येते.
खरे तर हा पेशंट खूपच लकी म्हणावा लागेल, कारण कामगार असून यासाठी लागणारा पैसा तो उभा करू शकला नसता; परंतु सुनील शेळके यांच्यामुळे आज त्याला त्याचा हात परत मिळाला आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अथक् परिश्रमामुळे ही अवघड आणि खूप वेळखाऊ शत्रक्रिया यशस्वी पार पडली. अशा केसची स्टडी मेडिकल स्टुडंटस् आणि इतर डॉक्टर्सना अभ्यासासाठी व प्रॅक्टिस करताना मार्गदर्शक ठरते. त्यांची इत्थंभूत माहिती नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
डॉ. सत्यजीत वाढोकर, व्यवस्थापकीय संचालक, पवना मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002