व्हीएस न्यूज – स्मार्ट सिटी योजनेसह विविध योजनांची कामे विहित वेळेत पूर्ण करणे आणि कामकाजात गतिमानता आणण्याच्या दृष्टीने महापालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापना केली, तसेच त्या सेलकरिता स्वतंत्रपणे आकृतीबंध निश्चित करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारित जेएनएनयुआरएम प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना, पंतप्रधान आवास योजना, सीएसआर सेल, सिटी ट्रान्स्फॉमेंशन ऑफीस, अमृत योजनांचे कामकाज करण्यात येत आहे. विशेषतः स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विविध कामे वेळेत पूर्ण करणे, त्या कामकाजात गतिमानता वाढविणे आवश्यक आहे. या कामकाजासाठी पालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापन केली आहे. त्या सेल करिता स्वतंत्र आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे.
पालिका प्रशासन विभागाने स्मार्ट सिटी सेल स्थापन करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. प्रशासन विभागाने त्या सेलची रचना व आकृतीबंध निश्चित केला. तसेच त्या सेलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, कार्यालयीन अधिक्षक राजीव घुले, लेखापाल आबासाहेब चौधरी, लिपीक प्राजंल इंगळे, प्रशांत यादव आणि शिपाई एकनाथ येंचवाड यांची नियुक्ती करुन त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिलेला आहे.
दरम्यान, “स्मार्ट सिटी सेल’चे कामकाज करण्यास नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र, राज्य शासन व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडील आदेशानुसार कामे करावी लागणार आहे. तसेच सेलबाबत दैनंदिन कामकाजाचा अहवाल मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांनी प्रत्येक आठवड्यास मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त हर्डीकर यांच्याकडे सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – मोशीतील कोर्टाच्या नियोजित सुसज्ज इमारतीबरोबरच मोरवाडी कोर्टाच्या स्थलांतराबाबत पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी व उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय न्यायाधिशांची एकत्रित बैठक पुण्यात पार पडली. नव्या जागेतील इमारतीमध्ये स्थलांतरीत होणाऱ्या इमारतीमधील नियोजित न्यायालये व या इमारतीच्या भाड्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पुणे शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या बैठकीला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री गवई, श्री बेदर, श्री कर्णिक, जिल्हा न्यायाधिश श्रीराम मोडक, पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राजेश पुराणिक,ऍड. कालिदास इंगळे, ऍड. तुकाराम पडवळ, ऍड. कांता गोर्डे, ऍड. प्रदीप ढोले, ऍड. हर्षद नढे, ऍड. गणेश राऊत, ऍड. विकास बाबर, ऍड.नीलेश घोडेकर, ऍड. ज्ञानेश्वर होलगोली, ऍड. प्रतिभा हगवणे, ऍड. प्रसन्ना लोखंडे, ऍड. अतिश लांडगे, ऍड. किरण पवार, ऍड. सुहास पडवळ आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, नव्याने स्थलांतरीत होणाऱ्या इमारतीमध्ये सिनिअर डिव्हिजन कोर्ट, ऍडीशनल सेशन कोर्ट,कामगार न्यायालय, मोटर व्हेईकल ऍक्ट कोर्टासह नऊ प्रथम वर्ग न्यायालय सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नव्याने उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या इमारतीचे भाडे कमी करण्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित चर्चा करुन, भाडेनिश्चित करण्याच्या सूचना करण्यात आल्या. उपस्थित न्यायाधिशांच्या या सर्व सूचनांचा आदर करुन,महापालिका प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करु, असे आश्वासन बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी दिले.
व्हीएस न्यूज - अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्युमुळे सांगली पोलीस दलाच्या अब्रुचे राज्यात धिंडवडे निघाले आहे. या घटनेनंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी बुधवारी (दि.15) ताब्यात घेतलेल्या आयुब शेख याचा घातपात केल्याची तक्रार त्याचा चुलतभाऊ शाहरुख शेख यांनी वडगाव मावळ न्यायालयात केली आहे. या तक्रारीवरुन पोलीस अधिक्षक सुवेझ हक, देहूरोडचे पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर व तळेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना येत्या मंगळवारी (दि.21) जबाब देण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस न्यायालयाने बजावली आहे.
अर्जदार शाहरुख शेख मावळ तालुक्यातील ताजे गावचे रहिवासी असून, बुधवारी (दि.15) त्यांना तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी फोन करुन, आयुब शेखच्या कुटुंबाविषयी चर्चा करुन, आम्ही त्याला पोलीस कर्मचारी रुममध्ये ठेवले असल्याचे सांगितले. मात्र, कोणत्या गुन्ह्यात अटक केली आहे, याविषयी त्यांनी शेख यांना कोणतीही माहिती दिली नाही. दुसऱ्यादिवशी शाहरुख शेख आपल्या वडीलांसह तळेगाव पोलीस स्टेशनला गेले, तसेच आयुबचे वडीलही पोलीस स्टेशनला गेले असता, सोनवणे यांनी त्यांना आयुबची भेट न घेऊ देताच हुसकावून लावल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे.
सोनवणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गेली चार दिवस आयुबचा कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे तळेगाव पोलीस आणि पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर यांनी आयुबचा घातपात केल्याची तक्रार शाहरुख शेख यांनी वडगाव मावळ न्यायालयात केली आहे. याची दखल घेत, येत्या मंगळवारी (दि.21)या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनवाणीला जबाब देण्यासाठी पोलीस अधिक्षक सुवेझ हक, देहूरोडचे पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर व तळेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयुब शेख हा सराईत गुन्हेगार असुन, पौड येथे 2010 मध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात तो चार वर्षे शिक्षा भोगुन आला आहे. सध्या त्याला तळेगाव पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून,न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी येरावडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबियांनी केलेले आरोप निराधार आहेत.
– वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन.
व्हीएस न्यूज - शहरातील गोरगरीब, उपेक्षित, वंचित झोपडपट्टीतील नागरिकांना घरे मिळावीत, याकरिता महापालिकेने झोपडपट्टी निर्मूलन व पुन:विकास प्रकल्प मिलिंदनगरमध्ये राबविला. मात्र, या पुनर्वसन प्रकल्पातील अनेक मूळ लाभार्थी अन्यत्र स्थलांतरीत झाले असून, त्या लाभार्थ्यांनी घरे भाडोत्री दिली आहे. विशेषत: “झोनिपु’ कार्यालयातील एका लिपिकाने आर्थिक संगणमताने झोपडपट्टी धारकांना बोगस कागदपत्राच्या आधारे फोटोपास बनवून त्यांना लाभार्थी बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत लिपिकासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करुन कडक कारवाईची मागणी ग्राहक हक्क संघर्ष समितीचे शहर सरचिटणीस भीमराव तुरुकमारे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे 72 घोषित व अघोषित झोपडपट्टी कार्यरत आहेत. शहरातील झोपडपट्यांचे प्रमाण कमी करुन तेथील नागरिकांना घरे उपलब्ध करण्यात येत आहे. याकरिता महापालिकेने झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाद्वारे शहरातील अनेक झोपड्यांचे 2002 मध्ये सर्व्हेक्षण केले होते. त्यानुसार झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना फोटो पास बनवून त्यांची यादी तयार केलेली आहे. त्यानुसार त्या रहिवाशांचे पुनर्वसनासाठी “एसआरए’ अतंर्गत घरांचे प्रकल्प राबविलेले आहेत. महापालिकेने पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये नागरिकांच्या घरांसाठी झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्प टप्पा क्रमांक-2 राबविला. त्या पुनर्वसन प्रकल्पांतील तथागत हौसिंग सोसायटीत अनेक बोगस लाभार्थींना घरांचा लाभ दिला असून, लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यासाठी बोगस कागदपत्राचा वापर करण्यात आला आहे.
त्या पुनर्वसन प्रकल्पात शेकडो मूळ लाभार्थी नागरिक वास्तव्य करीत नाहीत. त्यांनी अन्यत्र घरे घेवून प्रकल्पातील त्यांची घरे भाडोत्री दिली आहे. तसेच एकाच लाभार्थ्यांला संजय गांधीनगर झोपडपट्टीत फोटोपास देवूनही त्याला मिलिंदनगरमध्ये घराचा लाभ मिळाला. पण, त्यानेही पूर्वीच्याच ठिकाणी वास्तव्य करुन ते घर भाड्याने दिले आहे. दरम्यान, महापालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक लाभार्थ्यांना घरे मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्राचा आधार घेवून फोटोपास देत लाभार्थी केले आहे. झोपडपट्टी सर्व्हेक्षणात घरांसाठी पात्र ठरलेल्या काही नागरिकांची नावे गायब करुन लक्ष्मी दर्शन केलेल्यांची नावे संभाव्य झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यादीत समाविष्ट करत त्यांना फोटोपास दिलेले आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील मूळ लाभार्थी घरापासून वंचित राहू लागली आहेत.
सर्वसामान्य माणसांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे. याकरिता झोनिपु प्रकल्प राबविला जातो. परंतु, झोनिपु कार्यालयातील एका लिपिकाने दलाली सुरु केली आहे. त्या लिपिकांने अनेक लाभार्थ्यांची बनावट कागदपत्राच्या सहाय्याने आर्थिक हितसंबंध जोपासत घराचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरापासुन वंचित राहावे लागत आहे. त्या लिपिकाने गौतमनगर, मिलिंदनगर याठिकाणच्या प्रकल्पांत बोगस लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करुन त्यांना लाभार्थी केले आहे.
व्हीएस न्यूज – वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावरील काही घरे रस्त्यात जाणार आहेत. त्या घर मालकांना प्राधिकरणाने नोटीसा बजाविल्या आहेत. मात्र, आपली घरे वाचवीत, अथवा घरच्या बदल्यात घर मिळावे, याकरिता वाल्हेकरवाडी येथील दत्त मंदिरासमोर बांधितांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनी घराबाबत असलेली मागणी प्रशासनाकडून सोडवून न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने बाधितांनी उपोषण मागे घेतले आहे.
वाल्हेकरवाडी-रावेत या मार्गावरील घरे वाचावीत किंवा घराच्या बदल्यात घर अथवा जागा प्रशासनाने द्यावी, या मागणीकरिता वाल्हेकरवाडीतील नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. महापालिका व नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या भागाचे रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन झाले नसल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. त्या रस्ता-रुंदीकरणामध्ये काही बैठी घरे बाधित होत आहेत. त्या घरांना खाली करण्याच्या प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. त्यावर बधितांनी ग्रामपंचायतची परवानगी घेऊन घरे बांधली आहेत. ही आमची घरे अनधिकृत व रस्ता बाधित कसे ठरतात. या बाबत आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा व आम्हाला घराच्या बदल्यात घरे द्यावीत, या मागणीसाठी शशिकांत खाडे, प्रवीण देशमुख, अरुण देशमुख, पोपट खडतरे, बाळासाहेब गुळुंजकर, शरद पवार, हसीना शेख, शारदा नाईकनवरे, कमल शिंपी, मंदा सरोदे, माधुरी वायकर, नदाफ पठाण, शोभा इंगळे आदी आमरण उपोषण करीत होत.
दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपोषणकर्त्या नागरिकांना आपल्या मागण्यांवर प्रशासनाशी चर्चा करुन योग्य तो तोडगा काढून न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी उपोषण मागे घेतले आहे. यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, शिवसेनेचे सल्लागार भगवान वाल्हेकर, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर चिंचवडे, चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आदींच्या उपस्थित होते. तसेच नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्वर भोंडवे, सचिन शिवले, नाना मरळ, छावाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील आदींनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती नागरिकांनी केली होती.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अपंगांच्या स्टॉल धारकांवर अतिक्रमणाच्या नावाखाली नोटीस न देता कारवाई करण्यात येत आहे, याबाबत संपूर्ण अहवाल तात्काळ अपंग कल्याण आयुक्तालयाकडे सादर करावा आणि पुढील आदेश देईपर्यंत अपंग स्टॉलवरील कारवाई स्थगीत ठेवण्याचे आदेश अपंग कल्याण आयुक्तांनी प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
कोणतीही पूर्व सूचना न देता कारवाई होत असल्याची तक्रार प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी केली होती. याची तात्काळ दखल पुणे अपंग कल्याण आयुक्तालयाने याची तात्काळ दखल घेतली व स्थगितीचे आदेश दिले व सात दिवसात विस्तृत अहवाल सादर सादर करावा व अपंग व्यक्तीबाबत अर्धन्यायिक प्रक्रिया अनुसरण्यात येईल. चौकशीचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित अपंग स्टॉल विरुध्दची कारवाई पुढील आदेशापर्यंत स्थगीत ठेवावी, अशी सूचना केली.
अपंग व्यक्तींना नियमानुसार समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग 1 जानेवारी 1996 पासून लागू केला. यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना व प्राधिकरणांना त्यांच्या क्षेत्रातील अपंग अर्थात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणकारी कामांसाठी दारिद्य्र निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तीन टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. नागरी भागात दिव्यांगांच्या कल्याणासाठी कोणत्या प्रयोजनानिमित्त हा निधी खर्च करावा? हा निधी अन्य कोणत्याही कामासाठी खर्च करू नये. यावर दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला निधी खर्च केला जातो का किंवा कशा पद्धतीने? याबाबत आढावा घेण्याची सूचना अपंग कल्याण संचालनालयाने संबंधितांना दिल्या आहेत.
राखीव निधी खर्च व्हावा…
दिव्यांगांसाठी निधी राखीव ठेवणे, तो त्यांच्याच कामासाठी खर्च करणे, याची पूर्तता होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी अपंग व्यक्ती अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, तसेच राखीव तीन टक्के निधीचा वापर त्यांच्यासाठीच करावा, अशी मागणी प्रहार क्रांती आंदोलनचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण यांचा आरोप
व्हीएस न्यूज – पोलिसांविरोधात आंदोलन केल्याने भाजप नगरसेवक तुषार हिंगे याच्या सांगण्यावरुन निगडी पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष रामा चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या खोट्या तक्रारीमधून वगळण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
नगरसेवक तुषार हिंगे व काही तरुणांमध्ये भांडण झाले होते. याचे पर्यावसन यमुनानगर चौकीसमोरच प्राणघातक हल्ल्यात झाले होते. मात्र, नगरसेवक तुषार हिंगे याच्याविरोधात तरुणांची तक्रार घेण्यास निगडी पोलीस टाळाटाळ करत होते. निगडी पोलिसांच्या या बेजबाबदार वर्तणुकीच्या निषेधार्थ या तरुणांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमरण उपोषण केले होते.
उपोषणकर्त्यांमध्ये संतोष चव्हाण यांचा देखील समावेश होता. त्यानंतर नगरसेवक तुषार हिंगेसह त्याच्या साथीदारांवर निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हिंगे यांच्या सांगण्यावरुन निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. दरम्यान, नगरसेवक हिंगे याच्यावर गुन्हा दाखल असताना देखील, त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
व्हीएस न्यूज - एशियन ओसिएन स्टॅंडर्ड सेटर ग्रुपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवाजी झावरे यांचा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
पश्चिम भारत प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष विष्णू अगरवाल, उपाध्यक्ष सर्वेश जोशी, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, अमोद भाटे, युवराज तावरे, प्राजक्ता चिंचोळकर, सुहास गार्डी, संतोष संचेती, अनिल अगरवाल,सचिन बन्सल आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम निगडी येथील शाखेच्या सभागृहात संपन्न झाला. एशियन- ओशिएन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुप ही आशियाई प्रदेशातील लेखा मानक संबंधित संघटना आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय मानकांचा अवलंब करण्यासंबंधित चर्चा तसेच उच्च गुणवत्तायुक्त जागतिक लेखा मानकांच्या विकासात सहभागी होण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली असून शिवाजी झावरे हे या संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिलेच भारतीय सनदी लेखापाल ठरले आहेत. शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींना पूरक ठरतील असे मानक बनविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे शिवाजी झावरे यांनी यावेळी सांगितले.
व्हीएस न्यूज – ज्ञानाची हो माऊली, शीतल तिची साऊली, लवकर ये रे, ये, रे विठूराया, तु विठ्ठल, मी विठ्ठल, सकल जग विठ्ठल, अशा एकापेक्षा एक सरस अशा भावपूर्ण काव्यरचनांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. निमित्त होते ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त आयोजित हरी मुखे म्हणा या कवी संमेलनाचे.
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव होते. यावेळी साहित्यिक सुरेश कंक ज्येष्ठ कवी बाबू डिसूझा, कार्यक्रमाचे संयोजक व मंडळाचे कार्यवाह प्रदीप बोरसे, कवयित्री शोभा जोशी, शरद शेजवळ हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात राज अहेरराव यांनी सुरुवातीला आजच्या पावन दिनाची कशी होईल हो उतराई, आज पुरूष सारे विठ्ठल, स्ञिया दिसे रखुमाई या ओळी सादर केल्या. ते पुढे म्हणाले, संत ज्ञानेश्वर हे जगाच्या पाठीवर एकमेव असे संत होऊन गेले की त्यांनी विश्वात्मकतेचा संदेश दिला. ते समजण्यासाठी त्यांना देव म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून बघावे. त्यांनी आपल्या आचरणातून स्ञियांना सन्मान, सर्व पंथांना समदृष्टीने बघणे, सहनशीलता, विनम्रता, समता,बंधुता, अध्यात्मातून मुक्ती प्राप्त करून देण्याचे मार्ग सुचवले आहेत. त्यासाठी प्रत्येकाने ज्ञानेश्वर फक्त वाचू नये तर त्यांच्या अभंगाचा भावार्थ आचरणात आणावा. माउलींनी समाधी घेऊन 721 वर्षे झाली. आजही त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती आळंदीला येऊ शकते.
सुरेश कंक म्हणाले की, माउलींचे पसायदान प्रेम, करूणा आणि अखंड मानव जातीला त्यांच्या कल्याणाचा सन्मार्ग दाखवणारा महामंञ आहे. पसायदान आणि माउलींचा हरीपाठ तोंडपाठ असून चालणार नाही तर कृतीने अंगीकारला पाहिजे. दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरीनामाचा, भक्त नामात रंगला या भजनाने माधुरी विधाटे यांनी कवी संमेलनाचा प्रारंभ केला. याच पाञातून वाहे, शुद्धसा ओलेपणा. हे इंद्रायणीचे मनोगत नंदकुमार मुरडे यांनी व्यक्त केले. ज्ञानाची हो माऊली, शीतल तिची साऊली. हे गीत आय. के. शेख यांनी सादर केले. लुसलुसणारी हिरवी पाने, कोकीळेचे मंजुळ गान अशी सुंदर शब्दकळा लेऊन असा ऋतुराज वसंत अवतरला राजेंद्र घावटे यांच्या शब्दांतून. लवकर ये रे, ये, रे विठूराया अशी आर्त साद घातली नितीन यादव यांनी. तर तु विठ्ठल, मी विठ्ठल, सकल जग विठ्ठल अशा शब्दात एकत्वाची सुरेख अनुभूती वर्षा बालगोपाल यांनी दिली.
अशोक कोठारी, नंदकुमार कांबळे, मधुश्री ओव्हाळ, राधा वाघमारे, भाग्यश्री कुलकर्णी, प्राची देशपांडे, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, सुमन दुबे या कवींच्या रचनांनी वातावरण भक्तीमय झाले. ह.भ.प. श्यामराव गायकवाड यांनी संजीवन समाधीचा सोहळा शब्दांतून मूर्तिमंत साकारला. माउलींचा जीवनपट उलगडत ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी सूञसंचालन केले. सुरेश पवार यांनी आभार मानले. पसायदानाने या भक्तीमय सोहळ्याची सुरेल सांगता झाली.
व्हीएस न्यूज – एका क्लिनरने आपल्या सहकारी चालकावर चाकू हल्ला केला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी अकराच्या सुमारास निगडीतील अंकुश चौकात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक रोशन वर्मा (वय 27, रा. डोंबिवली) आणि क्लीनर खिलेश्वर कुमार यादव (रा. बिहार) हे एकाच माल वाहतूक ट्रकवर कामाला होते. याप्रकरणी आरोपी खिलेश्वर कुमार यादवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
क्लीनर खिलेश्वरला नेहमी चालकापासून धोका असल्याचे भासत होते. त्यातूनच त्याने हे कृत्य केले. सकाळी डोंबिवली येथून भोसरीमध्ये पत्रे पोहचवण्यासाठी हे दोघे ट्रक घेऊन आले होते. मात्र, निगडीतील अंकुश चौकात आल्यानंतर अचानकपणे खिलेश्वरने चालकाच्या पोटात चाकूने वार केले यात चालक गंभीर जखमी झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002