व्हीएस न्यूज – अखिल भारतीय सफाई मजदुर कॉंग्रेस कामगार संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. सुधाकरन पणीकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर व संबंधित अधिकारी यांच्या समवेत सोमवार दि.११ डिसेंबर २०१७ रोजी आढावा बैठक घेतली.
आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता देवाअण्णा गट्टुवार, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, रमेश वस्ते, सहाय्यक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, अखिल भारतीय सफाई मझदूर कॉग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष संतोषकुमार नायडू, उपाध्यक्ष प्रेमचंद चनाल, राजू परदेशी, कार्याध्यक्ष राजू खैरे, सरचिटणीस दिलीप मोटा, कायदा सल्लागार अँन्थोनी बनसोडे, सदस्य राजेश टक्कले, सुरेश जाधव, रमेश विटकर, बबन छजलाने, रेखा सरपटा, शांताराम बाल्मिकी, अजय चव्हाण, भारत
आवडे आदी उपस्थित होते. या बैठकीत लाड समितीच्या शिफारसीनुसार मिळणा-या सुविधा व त्यांची अंमलबजावणीबाबत, सफाई कामगारांची रिक्त पदे भरणेबाबत, सफाई कर्मचारी यांना शासकीय सुट्टीच्या दिवशी काम केल्याबद्दल दिडपट वेतन अदा करणेबाबत, सुधारीत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत पहिला व दुसरा लाभ मंजुर करताना शैक्षणिक अहर्ता व जात पडताळणी अट शिथिल करणेबाबत, सफाई कर्मचारी यांना घरे बांधून देणेबाबत, वैद्यकीय विभागातील कर्मचारी यांना शनिवारचे दिवशीचे कामकाज वेळेबाबत,आजारी असलेल्या कर्मचारी यांचे बदली बाबत, सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करण्याबाबत तसेच तदअनुषंगिकमहानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत माडण्यात आलेल्या सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत लवकर कार्यवाही करणेबाबत डॉ. सुधाकरन पणीकर यांनी मागणी केली. तसेच महापालिकेने सफाई कर्मचा-यासंबंधी केलेल्या इतर कामांबाबत समाधान व्यक्त केले.
व्हीएस न्यूज - कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून विशेष कार्य अधिकार्याने वायसीएम रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकाला धमकी दिल्याच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी आज रुग्णालयासमोर आंदोलन केले.
कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. पद्माकर पंडित यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांना शुक्रवारी (दि.८) धमकी दिली होती. ‘माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईल’. माझ्या नादाला लागाल तर मी सगळ्यांची वाट लावीन, अशी धमकी दिली होती. याबाबत डॉ. देशमुख यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच डॉ. पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. दोन दिवस महापालिकेला सुट्टी होती. त्यामुळे धमकी प्रकरण शांत होते. सोमवारी कामकाज सुरु होताच वायसीएमएचच्या रुग्णालयातील डॉक्टर,कर्मचा-यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर काही काळ आंदोलन केले.
व्हीएस न्यूज - चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ कॉमर्स-सायन्स ॲन्ड इंफर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (सीएसआयटी) वतीने आयोजित केलेल्या “रन फॉर पिस ॲन्ड युनिटी ऑफ इंडिया” या मिनी मॅरेथॉनमध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पावणेपाच किलोमीटरच्या या स्पर्धेत रोहित मगदूम याने प्रथम क्रमांक पटकविला.तर सचिन शिंगोडे, गजानन पाल हे अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांकावर राहिले.
कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी नगरसेवक नामदेव ढाके, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस निरीक्षक डी.के म्हसे, प्राचार्य डॉ. के.एम जाधव, क्रीडा शिक्षक सावित्री मांढरे आदी उपस्थित होते. यावेळी उपनिरीक्षक अंतरकर यांनी विद्यार्थ्यांना शांतता व एकात्मतेविषयी शपथ दिली.
नामदेव ढाके म्हणाले कि, युवक हे देशाचे भविष्य आहे. युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावेत. देशांत युवकच परिवर्तन घडवून आणू शकतात. क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकात्मता टिकविण्याचे कार्य होत आहे. क्रीडा उपक्रमातून विकास घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आयबीएमआरचे प्रवेशद्वार ते मोरवाडी कोर्ट-आयुक्त बंगाला पुन्हा आयबीएमआर कॉलेज या मार्गाने विद्यार्थी धावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरी भाटीया तर आभार प्रिया जंजलवार यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोचे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना, अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहे. या वृक्षांचे नुकसान होऊ नये, या करिता वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतू या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची जबाबदारी महामेट्रोच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतली आहे. प्रायोगिक तत्वावर वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. या ठिकाणी ४० वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे उपव्यवस्थापक भानुदास माने यांनी दिली.
एसटी आगाराच्या आवारात सकाळी प्रायोगिक तत्वावर दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. सर्वसाधारणपणे केले जाणारे पुनर्रोपण आणि जागतिक स्तरावर मान्य केलेले वृक्ष पुनर्रोपण अशा दोन पद्धतीचा अवलंब केला आहे. पुनर्रोपण केलेले वृक्ष १०० टक्के जगतील याची दक्षता घेतली जाणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरात किमान तीन आणि पुणे परिसरात किमान ३ हजार वृक्षांचे रोपण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. आळंदी-दिघी येथेही वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. पिंपरी ते हॅरिस पुलापर्यंत १३५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. प्राधिकरणाने आकुर्डी येथे पाच एकर क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे. तेथे १२५ वृक्षलागवड केली जाईल. एकूण ६०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. मेट्रो मार्गावर तीन ते चार वर्षापूर्वीची २०० झाडे आहेत. त्यातील मार्गात अडथळा ठरणाऱ्या ६० वृक्षांचे पिंपरीतील गुलाबपुष्प वाटिकेत पुनर्रोपण केले आहे.
जिल्हा प्रशासनाला यूआयडीएआयकडून ५० यंत्रे
व्हीएस न्यूज – पुढील आठवडय़ापासून केवळ आधारकार्डमधील दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी अपडेट क्लायंट लाइफ किट (यूसीएल) वापरण्याकरिता जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ही ५० यंत्रे दोन-तीन दिवसांत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहेत. ही सर्व यंत्रे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत. या यंत्रांद्वारे केवळ एका बोटांच्या ठशावरून पाच मिनिटांत आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यात येणार आहे.
गेल्या चार महिन्यांपासून आधार केंद्रांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील आधार केंद्रांवर येणारे बहुतांश नागरिक आधारकार्डात जन्म दिनांक, मोबाईल क्रमांक, निवास पत्ता, छायाचित्र याबाबत दुरुस्ती करण्यासाठी गर्दी करत आहेत. एका आधार यंत्रावर एका व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरुस्तीचे काम करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यानुसार सकाळी दहा ते सहा या वेळेत केवळ २० ते २५ आधारची कामे होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधार दुरुस्तीकरिता यूआयडीएआयकडे यूसीएल यंत्रांची मागणी प्रस्ताव पाठवून केली होती. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून ५० यूसीएल यंत्र तीन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे येणार आहेत.
या यंत्रांद्वारे एका बोटाचा ठसा घेऊन पाच मिनिटांमध्ये दुरुस्ती करता येते. एका यंत्राद्वारे प्रतिदिन ७० ते ८० आधार दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुब्बुळांचे स्कॅनिंग होत नसल्यास संबंधित नागरिकांची नोंद करून त्याबाबतची पावती यूआयडीएआयकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आधारचे नोडल अधिकारी आणि तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली.
यूसीएल डिव्हाइस काय आहे?
अपडेट क्लायंट लाइफ (यूसीएल किट) हे एक बायोमॅट्रिक डिव्हाइस आहे. या डिव्हाइसला लॅपटॉप आणि प्रिंटर जोडावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास यूसीएल यंत्र येणार असून महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पाच यंत्र बसविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. आधारची दुरुस्ती करताना छायाचित्राचे ओळखपत्र आणि पत्ता पुरावा आवश्यक आहे.
व्हीएस न्यूज – सांगलीतील पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरण राज्यातील पोलिसांना चांगलेच महाग पडले होते. असे असताना देशात सर्वाधिक कोठडीतील मृत्यू महाराष्ट्रात होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ‘क्राईम इन इंडिया २०१६’ च्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राईम इन इंडिया २०१६’ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये देशातील पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोठडीत मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात झाल्याची नोंद एनसीआरबीने अहवालात केली आहे. देशात २०१६ मध्ये ९२ जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ६९ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. २१ प्रकरणांत पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशात सर्वाधिक कोठडीत मृत्यू महाराष्ट्र (१६) झाले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश (११) आणि गुजरात (११) या राज्याचा क्रमांक लागतो. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोठडीत मृत्यू नोंदले गेले असून येथे घडलेल्या बारा घटनांमध्ये न्यायालयीन चौकशी सुरू आहे. तर, तीन प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात किंवा कोठडीत घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे असल्याचे दिसून आले आहे. कोठडीत आत्महत्या केल्याच्या सर्वाधिक म्हणजे ३८ घटना झाल्या आहेत. त्यानंतर विविध आजारांमुळे २८ जणांचा कोठडीत असताना मृत्यू झाला आहे. गुन्हेगारांसोबत कोठडीत असताना झालेल्या भांडणात दोघांचा मृत्यू झाला. तर, तपासासाठी बाहेर घेऊन जाताना अपघात होऊन देखील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच कोठडीतून पळून जाताना चारजण ठार झाले आहेत.
पोलीस अधिकारी किंवा कर्मचा-यांनी कोठडीत केलेल्या मारहाणीत मृत्यूच्या घटना आठ असल्याचे एनसीआरबीच्या अहवालात नमूद केले आहे. कोठडीत असताना पळून गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशात कोठडीतून १३२० आरोपी पळून गेले आहेत. त्यापैकी ९५० जणांना अटक करण्यात आली. कोठडीतील आरोपी पळून जाण्यांमध्ये उत्तर प्रदेश मध्यप्रदेश (१३३) आघाडीवर आहे. त्यानंतर (२८२) आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढली आहे. या यात्रेचा समारोप नागपूर येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला होणार आहे. या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील ५०० कार्यकर्ते सहभागी होणार असून ११ डिसेंबरला कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली आहे.
संजोग वाघेरे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. कर्जमाफी फसली आहे. शेतक-यांना कर्जाचे पैसे अजून मिळाले नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य सरकार भरकटले आहे. सत्ता राबवायची कशी हेच त्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते शेतक-यापर्यंत प्रत्येक समाजघटकाला अहितकारक असे निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत. सरकारच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. या पदयात्रेला विदर्भात शेतक-यांसह सर्वच घटकातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आमचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह आजी-माजी खासदार आमदार मोर्चात सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील देखील काही पदाधिकारी हल्लाबोल पदयात्रेत सहभागी झाले आहेत. शेतक-यासह सर्वंच घटकातील नागरिक मोर्चात सहभागी होत आहेत. आपल्या व्यथा पक्षाच्या नेत्यांना सांगत आहेत. त्यांचे प्रश्न समाजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाचे नेते करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. या मोर्चात पिंपरी-चिंचवड शहरातून ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामध्ये माजी आमदार, महापौर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका सहभागी होणार आहेत अशी माहिती संजोग वाघेरे यांनी दिली.
बैठकीसाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष पवक्ते फजल शेख, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विजय लोखंडे, जगन्नाथ साबळे, प्रदिप गायकवाड, शुक्रुल्ला पठाण, यतिन पारेख, आनंदा यादव,सी.आर. कांबळे, गंगा धेंडे, विश्रांती पाडाळे, पुष्पा शेळके, कविता खराडे, सविता खराडे, शहजादी सय्यद, मनिषा गटकळ, शकुंतला भाट, सचिन माने, गोरोबा गुजर, तुकाराम बजबळकर, बाळासाहेब जगताप आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
व्हीएस न्यूज - एका रिअल इस्टेट एजंटचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना दिघी येथे घडली. ही घटना शनिवारी (दि.९) मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास दिघी येथील दत्तमंदीरा जवळ घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश अंताराम गंगणे (वय-40 रा. दत्तनगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर अरविंद वंजारी (रा. दिघी), तुषार (पूर्ण नाव माहित नाही), प्रमोद शेलार (रा. दिघी), निलेश कुदळे (रा. वडमुखवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश यांचा भाऊ सुरेश अंताराम गंगणे (वय-४५, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गंगणे हे रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. काल रात्री आरोपी आणि मयत हे सर्वजण न्यु मोहर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सव्वाएकच्या सुमारास आरोपी अरविंद आणि त्याचे भाचे तुषार, प्रमोद आणि निलेश या चौघांनी गणेशच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन गणेश यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कदम तपास करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002