व्हीएस न्यूज - "कठीण प्रसंगातही धैर्याने सामोरे जात धाडसी निर्णय घ्यायला हवेत. तुमच्याकडे सुशासन, धोरणात्मक व्यवस्थापन आणि चांगल्या उपायांचे पर्याय असतील, तर जटील समस्या सोडविण्यात हमखास यश मिळते. नक्षलवादाच्या, मानवी तस्करीच्या आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनेक प्रसंगात या गोष्टींचा उपयोग झाला. समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधण्याची हातोटी यामुळे चांगले काम करणे शक्य होते,'' असे प्रतिपादन तेलंगणा राज्यातील राचकोंडाचे पोलीस पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी केले. आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या (डीवायपीआयएमएस) वतीने आयोजित नवव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महेश भागवत बोलत होते. याप्रसंगी प्रसन्न ट्रॅव्हल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न पटवर्धन, 'डीवायपीआयएमएस'चे कार्यकारी संचालक विंग कमांडर पीव्हीसी पाटील, संचालक डॉ. आशुतोष मिसाळ, डॉ. जे. जी. पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 'नेतृत्व, सुशासन आणि धोरणात्मक व्यवस्थापन ; यशाची गुरुकिल्ली' या संकल्पनेवर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. भागवत म्हणाले, "आज भारतासह जगभरात मानवी तस्करीचा प्रश्न मोठा आहे. 1700 पेक्षा अधिक वेश्यावस्ती देशात असून, 30 लाख वेश्या यामध्ये काम करताहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे. नक्षलवादाचा प्रभाव अलीकडे कमी झाला असला, तरी छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्राच्या काही भागात नक्षलवाद अधूनमधून डोके वर काढतो. आपल्या कुशल नेतृत्वाचा, नियोजनाचा आणि विवेकबुद्धीला विचार करून काम केले, तर अनेक समस्या सुटतात. नक्षलवादी भागात ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेल्या कामातून अनेक नक्षलवादी शरण आले. डॉ. आशुतोष मिसाळ यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. तसेच परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. दुपारच्या सत्रात इंडियन स्कुल ऑफ बिझनेसचे वरिष्ठ व्यवस्थापक जे. संदीप, मकरंद ब्रम्हे यांनी मार्गदर्शन केले. तर चर्चासत्रात आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे मुख्याधिकारी रेखा दुबे, सुनील कोडे, चैत्राली पेट्रोकेमिकल्सचे चेतन यादव, बिझनेस स्टॅण्डर्डचे सुमेध गुप्ते, हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल माया महंत यांनी सहभाग घेतला. सोनिया राजगिरे आणि वृषाली डोके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संजय गायकवाड यांनी आभार मानले....Read More
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करत 'पुढे खून झाला आहे, दागिने काढून बॅंगेत ठेवा' असे सांगून पावणे तीन लाखांच्या दागिन्याची बॅग हिसकावून नेली. ही घटना गुरूवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास बिजलनीनगर येथील गिरीराज सोसायटी समोर घडली. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांचे पती गुरूवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास बिजलीनगर येथील गिरीराज सोसायटी समोरून पायी जात होते. त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले. 'आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झाला असून दागिने बॅगेत काढून ठेवा' असे त्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला सांगितले. दागिने बॅगेत ठेवताच भामट्यांनी दोन लाख 70 हजार रूपये किंमतीचे दागिने असलेली बॅग हिसकावून पळ काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. देवताळे अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत एक वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाच्या पुढा-यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. मनपाची तिजोरी मोकळी करण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. करदात्या नागरीकांच्या पैशाची लूट आणि सावळा गोंधळ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरखास्त करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
पिंपरी (पुणे) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत साठे बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कडून पृथ्वीराज साठे, संग्राम तावडे,शानी नौशाद यांची प्रदेश सदस्य आणि भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत भिकाजी नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब वामनराव साळुंके आणि चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम शंकर गुंजाळ यांची निवड झाल्याचे जाहिर केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, एन्एसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहर कॉंग्रेस विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनतेच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपा बरखास्तीची मागणी आम्ही करणार आहोत. या बाबतचा निर्णय ताबडतोब घ्यावा व जनतेच्या पैशाची लूट थांबवावी. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी समिती नेमण्याचा फार्स करु नये. कारण मुख्यमंत्री हे भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालतात हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. मुख्यमंत्री हे ‘क्लीन चिटर’मुख्यमंत्री असल्याची टिका साठे यांनी केली. पिंपरी चिंचवड मनपात विरोधी पक्षाचे अस्तित्व नाही. शिवसेना चोरी झाली म्हणून विरोध करते का चोरीमध्ये वाटा मिळाला नाही म्हणून विरोध करते असा प्रश्न करदात्या नागरीकांना पडला आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध संशयास्पद आहे. भाजपाचे केंद्रापासून मनपा पर्यंत बहुमत आहे. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींची व जनतेच्या भावनांशी अनादर करण्याची सवय झाली आहे. त्यामुळेच खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला. पिंपरी चिंचवड मनपात भाजपाचेच नगरसेवक प्रवेशव्दारासमोर फ्लेक्स फेकतात त्यांच्या नेत्यांचे आदेश पाळत नाहीत आणि त्यांचे नेते देखील अशा लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत. अनाधिकृत बांधकामांवरील कारवाई नुसता दिखावा आहे. विशालनगर, वाकड येथील दारुचे दुकान भाजपाशी संबंधित व्यक्तीचे असल्यामुळे त्यावर कारवाई केली जात नाही. तर सर्व सामान्य जनतेच्या घरावर हातोडा मारला जात आहे. त्यांच्या कारवाईच्या त्रासातून एका महिलेने आत्महत्या केली अशा किती महिलांना जीव गमवावा लागेल. पाणी पट्टीतील दरवाढ झाकण्यासाठी 6 हजार लिटीर मोफत पाणी प्रत्येक कुटूंबाला दिल्याचे भांडवल करतात. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, शास्तीकर असे अनेक प्रश्न प्रलंबित असून वाकड मधील सीमा भिंतीत देखील यांनी भ्रष्टाचार केला. विकास कामांच्या निवीदा भरताना ठेकेदारांशी संगनमत करुन रिंग केली. याबाबत त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रतिनिधी तक्रार करीत आहेत. मेट्रोचे ते भांडवल करतात. मेट्रोचा प्रकल्प आघाडी सरकारने मंजूर केला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याची ही भाजपाची पध्दत जनतेला खाईत लोटणारी आहे. निवडणुकी पुर्वी कथीत भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करुन जनतेची दिशाभूल करुन सत्ता मिळविली. भ्रष्टाचा-यांना तुरुंगात पाठवू म्हणणा-यांनी त्यांनाच पक्षात घेतले. अशीही टिका सचिन साठे यांनी केली.
व्हीएस न्यूज - इंडीयन बिझनेस क्लबच्या (IBC)च्या वतीने पिंपरी चिंचवड मधील एमएसएमई (सुक्ष्म लघु मध्यम उद्योजक) उद्योजकांना व कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉन टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी (पुणे) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत इंडीयन बिझनेस क्लबचे (आयबीसी) संस्थापक अध्यक्ष अनिल मित्तल यांनी माहिती दिली.
शनिवारी, रविवारी (दि. 10 ते 11 फेब्रुवारी) रोजी परंदवडी, उर्से (ता. मावळ) येथील वेदांन्त स्पोटर्स ॲकेडमीच्या क्रिडांगणावर या लॉन टेनिस क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. स्टिल केस, स्ट्राईकर्स, आयबीसी रॉयल, रवी ॲव्हेंजर्स, एडीयंट आर्या,जेसीबी लॉयन्स, जय भवानी वॉरीयर्स, रोहित रायझिंग स्टार्स, आणि वसंत जग्वार्स हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी 8वाजता आणि स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
विजेत्या संघांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रायोजक वसंत ग्रुप, सह प्रायोजक के. मिंन्ट, आयव्हरी स्पेसेस आहेत. आयोजक केलक्टिव्ह मार्केटिंग ॲण्ड सर्व्हिसेस आणि धनलक्ष्मी इंटरप्राईजेस हे आहेत.
व्हिएस न्युज - पिंपरीतील भाटनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासुन स्थानिक राजकिय पुढार्यांच्या अनास्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. येथील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र शिवव्यापारी सेनेच्या आंदोलनामुळे आज या घाणीच्या साम्राज्यावर यशस्वी ‘सर्जिकल स्टाईक’ झाला असल्याची माहिती शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी दिली.
याबाबत युवराज दाखले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून भाटनगर परिसरात घाणीचे साम्राज्य होते. मात्र शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेनेने या समस्येला वाचा फोडण्यासाठी मोरवाडी चौकातील आहिल्यादेवी पुतळा येथे निदर्शने केली होती. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. सहाय्यक आयुक्त प्रमोद अष्टिकर यांनी तात्काळ दखल घेऊन आरोग्य निरिक्षकांना या ठिकाणी स्वच्छतेचे आदेश दिले. त्यानंतर आज भाटनगर येथील विद्युत पुरवठा खंडीत करून स्वच्छता मोहीम करण्यात आली. यावेळी दोन ट्रक कचरा उचलून नेण्यात आला. तसेच परिसरात औषध फवारणी देखील करण्यात आली.
या घाणीच्या साम्राज्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले व शिवव्यापारीसेना उपशहरप्रमुख गणेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या महिला शहर संघटिका भाग्यश्री मस्के,शिवसेना महिला विभागप्रमुख सारीका तामचिकर, शिवसैनिक दिपक कांबळे, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, नवनाथ गारगुटे यांच्यासह शिवसैनिक व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते
व्हीएस न्यूज - सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन घेऊन एका डॉक्टरने आत्महत्या केली. ही धक्कदायक घटना गुरूवारी दुपारी मोशी येथे उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. महेश महादेव मोहिते (वय-27, रा. सेक्टर नं.4 संतनगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मोहिते यांचे भोसरीत जयहिंद नावाचे रूग्णालय आहे. त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारी यांनी माहिती दिली. डॉ. महेश यांनी बुधवारी रात्री घरात त्यांच्या बेडरूममध्ये सलाईनव्दारे विषारी इंजेक्शन घेतले. सकाळी 11 वाजल्यानंतर रूग्णालयात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या चुलत भावाने डॉ. महेश यांच्या मोबाईलवर गुरूवारी सकाळी फोन केला. त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ घरी आला. त्यांनी डॉ. महेश यांच्या बेडरूरमचा दरवाजा वाजविला. आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी डॉ. महेश यांच्या हाताला सलाईन लावले होते. बेशुद्ध अवस्थेतील महेश यांना खासगी संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. भोसरी, एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - येथील 11 ते 15 वयोगटातील अमृता विद्यालयातील नऊ शाळकरी मुलींनी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात चढाईसाठी कोणताही मार्ग नसलेला कातळकडेचा खडतर तैलबेला किल्ला सर केला व तेथे भारताचा तिरंग फडकवला. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे महापालिकेतर्फे महापौर नितीन काळजे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सीमा सावळे, अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर, कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्या आशा धायगुडे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसेवक लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, अमित गावडे, बाळासाहेब ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मान करण्यात आलेल्यांमध्ये चेलूवी ढोकले, वैदही भोंगे, मानसी मगर, आकांक्षा पवार, श्रेया भदे, तानीक्षा पवार, वैष्णवी गवळी, मृणाल ठाकर, सई भालेघरे यांच्यासह मार्गदर्शक एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांचा समावेश होता.
व्हीएस न्यूज - पिंपरीतील गरवारे नायलॉन कंपनी बंद होऊन 22 वर्ष झाली. परंतू, या कामगारांना अद्यापही सेवा उपदान, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नसल्यामुळे उतारवयात कामगारांची मोठी परवड होऊ लागली आहे. कंपनी मालकाने याप्रश्नी योग्य तो न्याय देण्याची मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे. गरवारे नायलॉनच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या न्याय हक्कासाठी गरवारे कामगार कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची गुरूवारी निगडी येथे एक बैठक पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय खैरे, उपाध्यक्षपदी मोरया बहिरट, सत्येन राव, कार्याध्यक्ष मुरलीधर चिन्हे, सेक्रटरी रमेश बोंद्रे, सह सेक्रटरी शिवाजी साळुंखे, खजिनदार उदय भागवत यांची निवड करण्यात आली. याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरवारे नायलॉन कंपनी बंद होऊन 22 वर्ष झाली. कामगारांना अद्यापही सेवा उपदान, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम मिळविण्यासाठी कृती समितीने न्यायालयात धाव घेतली आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून अभिजीत देसाई यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या मागणीसाठी समितीचे पदाधिकारी शहरातील खासदार, आमदार, महापौर, पालिका आयुक्त आदींची भेट घेणार आहेत. तसेच कंपनीच्या जागेवर कोणाताही प्लॉन मंजुर करू नये, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष दत्तात्रय खैरे यांनी निवेदनाव्दारे सांगितले आहे.
व्हीएस न्यूज - आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू घडविण्यात शालेय जीवनातील प्राथमिक प्रशिक्षक महत्त्वाचा असतो. त्यांच्यामुळेच खेळाडू स्पर्धेचे विविध स्तर पार करीत राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर चमकू शकतो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू, गुणवंत क्रीडा शिक्षक, पत्रकार व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृह येथे नुकताच झाला. कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव व शकुंतला खटावकर,ऑलिम्पिक मॅरेथॉन धावपटू बाळकृष्ण अकोटकर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, क्रीडा भारतीचे राज्य कार्यवाह राज चौधरी, निगडी केंद्राचे उपप्रमुख मनोज देवळेकर, शरद इनामदार आदी उपस्थित होते. शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा शिक्षक सचिन खांदवे, जगदीश सोनवणे, बन्सी आटवे, संपदा कुलकर्णी यांना गुणवंत क्रीडा शिक्षक आणि मिलिंद कांबळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा परिषदेचे गुणंवत क्रीडा शिक्षक राजेंद्र महाजन, शबाना शेख, सुवर्णा घोलप यांचाही गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विविध शाळा व महाविद्यालयांतील 90 राष्ट्रीय व राज्य खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अंजली भागवत म्हणाल्या की, खेळात करिअर करताना आपले ध्येय निश्चित करा. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, ऑलिम्पिक, विश्व स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून शिस्त, सराव आणि जिद्दीने मार्गाक्रमण करा. मात्र, त्यासाठी शालेय वर्गाप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग पार करीत म्हणजे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तर टप्प्या-टप्प्याने स्पर्धा स्तर पार करून खेळाडूंनी पुढे गेले पाहिजे. त्यानुसार प्रशिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यांच्या शिवाय खेळाडूच कामगिरी करूच शकत नाही, असे त्या म्हणाल्या. मोरे, अकोटकर, आटवे यांनी मनोगत व्यक्त केले. कविता आल्हाट व अशोक जाधव यांनी सुत्रसंचालन केले. संघटनेचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. सचिव अंगदराव गरड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान सोनवणे, शेखर कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, सोपान खोसे, अनिल नाईकरे, अशोक अवारी, संजय देवरे, सुरेश मुळूक, ज्ञानेश्वरी लोखंडे, सुजाता चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज - पती समवेत फिरायला गेलेल्या ज्येष्ठ महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावली. ही घटना 23 जानेवारी रोजी वाकड येथे घडली. महिलेच्या 43 वर्षीय सुनेने बुधवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे सासू-सासरे 23 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता फिरण्यास बाहेर गेले होते. माऊंट बेस्ट बिबांत सोसायटीजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. आर. लोंढे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - दुचाकीचोर दोन सराईत गुन्हेगाराला गस्तीवरील पिंपरी पोलीस पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दीड लाख रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. सतीश दादाराव लोंढे (वय-22, रा. अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ, यशवंतनगर, पिंपरी), संतोष बबन लोंढे (वय-29, रा. दत्त मंदिराजवळ गुलाब पुष्प उद्यानासमोर गवळीमाथा, भोसरी) या दोघांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे फौजदार विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर यांच्यासह आदी पोलीस पथक डी. वाय पाटील महाविद्यालय परिसरात गस्त घालत होते. वेगाने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना थांबण्याची सुचना केली. दुचाकीस्वार तरूण थांबले नाहीत. पोलीसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देऊ लागले. पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीनी दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. यासह आणखी दोन दुचाकी चोरल्याचे त्यांनी तपासात सांगितले. तर मंगळवारी एका अल्पवयीन दुचाकीचोराला ताब्यात घेवून त्यांच्याकडून एक दुचाकी जप्त केली. तिघांकडून एक लाख 40 हजार रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002