व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आता महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर दिला आहे. दररोज मिळणारे उत्पन्न अल्पमुदत ठेवींच्या (फिक्स डिपॉझिट) स्वरुपात विविध बॅंकांमध्ये ठेवल्याने त्यातून महापालिकेला 50 कोटी 11 लाख रुपये मिळाले आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी महापालिका दररोज मिळणारे उत्पन्न चालू खात्यात जमा करत होते. हे पैसे खात्यांमध्ये निष्क्रिय पडून असायचे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी महापालिकेच्या चालू खात्यातील रक्कम अल्प मुदतठेवींमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी महापालिकेच्या दररोजच्या उत्पन्नावर दर महिन्याला कोट्यवधी रुपये मिळत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही आर्थिक संपन्नता असणारी महापालिका आहे. या महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बॅंकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी लगेच खर्च होत नसल्यामुळे तो विविध बॅंकांमध्ये दिर्घमुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवला जातो.
महापालिका बॅंकांमध्ये ठेवत असलेल्या मुदत ठेवींमुळे वर्षाला 155 कोटी 83 लाख 13 हजार 727 व्याज मिळत होते. मात्र महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने दररोज मिळणारे उत्पन्नही अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात विविध बॅंकांमध्ये ठेवण्याचा निर्णयाला पाठबळ दिले. दररोजचे कोट्यवधींचे उत्पन्न चालू खात्यामध्ये जमा करत असल्याने त्याचा महापालिकेला फायदा होण्याऐवजी संबंधित बॅंकांचा आर्थिक फायदा होत होता. त्यामुळे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी अल्पमुदत ठेवींमुळे महापालिकेच्या उत्पन्नात चांगली भर पडेल, असा सल्ला दिला. त्यानुसार महापालिकेच्या चालू खात्यांमधील जमा रक्कम अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात बॅंकांमध्ये ठेवण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध करून विविध बॅंकांकडून ठेवींवर किती व्याजदर देणार याची माहिती मागविली होती. त्यातील जास्तीत जास्त व्याजदर देणाऱ्या बॅंकांमध्ये अल्पमुदतीच्या ठेवी ठेवण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे महापालिकेला अल्पमुदत ठेवींच्या माध्यमातून एकूण 50 कोटी 11 लाख 88 हजार 132 रुपये व्याज मिळाले आहे. आजमितीला महापालिकेने विविध बॅंकांमध्ये एकूण 2 हजार 957 कोटी 92 लाख 81 हजार रुपये अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात ठेवले आहे. त्याच्या माध्यमातून 205 कोटी 83 लाख 13 हजार 727 रुपये महापालिकेला मिळले आहे.
व्हीएस न्यूज – मुलांना विचारी बनवा, हट्ट लगेच पुरवू नका, निर्णयक्षम बनवा, मुलांना वैचारिक अपंग बनवू नका, असा कानमंत्र लेखक मनोज अंबिके यांनी चिंचवड येथे दिला. साहित्य दर्शनच्या वतीने आयोजित केलेल्या वाचक महोत्सवात कानमंत्र – आई बाबांसाठी या विषयावर ते बोलत होते. यावेळी साहित्य दर्शनचे संचालक गणेश लोंढे, रवींद्र कासार आदी उपस्थित होते.
मनोज अंबिके पुढे म्हणाले की, वाढत्या वयात मुलांवर जबाबदारी टाकल्यास त्यांच्यात निर्णय क्षमता येते. त्यासाठी त्यांचे प्रेरणा स्थान बना. मुले जसजसे मोठे होतात तसे ते नियंत्रणाबाहेर जातात. मुलांना त्यांचे मत मांडू द्या. त्यांच्या भावनेचा आदर करावा. त्यांच्यातील आत्मविश्वास दाबू नका. लहानपणी वडील मुलांचे लाड केल्याने ते आवडतात. नंतर त्यांच्यातील बाप बदलत जातो. मग वडिलांना हिटलरचा शिक्का बसतो. याला कारणीभूत वडिलच असतात. मुलांना काय बोलता यापेक्षा कसे बोलता हे महत्त्वाचे आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. मुलांना लक्ष्मी टिकविण्यासाठी सरस्वतीची साधना करायला शिकवा. म्हणजेच ज्ञानी व विचारवंत बनवा. जेणेकरून ते वैचारीक अपंग होणार नाहीत, असे त्यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गंधालीकर यांनी केले. तर आभार गणेश लोंढे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - भोसरी येथील फुलेनगरमध्ये एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.
श्रीदेवी शरणाप्पा पाटोळे (वय-17, रा. फुलेनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रादेवी ही अकरावीमध्ये शिकत होती. काल रात्री तिने घऱातील स्वयंपाक घरात स्कार्फच्या सहायाने गळफास घेतला. आज सकाळी आईने स्वयंपाक घराचा दरवाजा ठोठावला परंतु आतुन काहीच प्रतीसाद मिळाला नाही. त्यामुळे तिच्या आई-वडीलांनी दरवाजा तोडला असता हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.
व्हीएस न्यूज – कार व रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा सोमवारी (दि.13) सकाळी सहा वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 1 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता म्हाळुंगे येथे घडला. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
गोरख महादु कानगुडे (वय 40 रा. म्हाळुगे ता. मुळशी) असे या रिक्षाचालकाने नाव आहे. याप्रकरणी संतोष खांडेकर (वय 27 रा केमसेवस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानगुडे हे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने रिक्षा चालवत असताना समोरुन येणा-या कारला त्याची रिक्षा धडकली. यामध्ये कानगुडे गंभीर जखमी झाले. त्यांना तताडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
व्हीएस न्यूज - कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना हातातील लोखंडी पाईप विजेच्या ट्रान्सफार्मरला लागल्याने मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी येथे सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये घडली. सचिन अशोक गायकवाड (वय 35 रा. बौद्धनगर पिंपरी) असे या मजुराचे नाव आहे. हा एका मंडप व्यवसायिकाकडे मजूर म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये एक घऱगुती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना सचिन यांच्या हातातील लोखंडी पाईप सोसायटीमधील विजेच्या ट्रान्सफार्मरला लागला. लोखंडी पाईप असल्याने सचिन याला विजेचा जोरदार धक्का बसला. सचिनला तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
व्हीएस न्यूज – महापालिकेतर्फे विकास कामांमध्ये सल्लागाराची नेमणूक करण्यात येते. अलिकडच्या काळात बहुतेक विकास कामांमध्ये सल्लागार नेमण्याची पद्धत निर्माण झाली आहे. सल्लागाराकडून कामे न होणे व काही राजकीय व्यक्तींना हाताशी धरुन या सल्लागार संस्थांनी कामे केल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका प्रशासनाकडे प्रत्येक विभागातील सक्षम व तज्ज्ञ अधिकारी असताना अशा प्रकारे सल्लागार नेमणूक कशासाठी? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हडिकर यांना निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाला सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्यास प्रशासनाने शासनाला कळवले पाहिजे.“सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आता चौथा सल्लागार नेमला आहे. पहिल्या तीन सल्लागारांनी काय केले, याचा आयुक्तांनी खुलासा करावा. सर्व्हे करण्यासाठी एक सल्लागार, कामासाठी वेगळा सल्लागार, तर आयुक्त व अधिकारी यांचे पालिकेत काम काय? याचे स्पष्टीकरण द्यावे. झोपडपट्टी निर्मूलन व पुन: विकास, पंतप्रधान आवास योजना व इतर कामे सल्लागार करीत असतील, तर प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बिनकामाचा पगार दिला जातोय का? सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाच्या उधळपट्टीला जबाबदार कोण? आणि का?असे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
…अन्यथा आंदोलन छेडणार!
झोपडपट्टी निर्मूलन, पुन: विकास योजना व पंतप्रधान आवास योजनेबाबत शहरवासीयांत अद्याप संभ्रम आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडे दोन ठिकाणच्या प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध नाही. झोपडपट्टीतील नागरिकांना व भाडेकरुंना सत्ताधाऱ्यांनी आगामी लोकसभा- 2019 निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भूलथापा देणे सुरू केले आहे. अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर रद्द करणे, रिंग रोड बाधितांचा प्रश्न मार्गी लावणे, या ऐवजी महापालिका सल्लागार नेमण्यावर भर देत आहे. आयुक्तांनी याकडे कानाडोळा करू नये व नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पांडुरंग परचंडराव यांनी दिला.
व्हीएस न्यूज - थेरगाव येथील सोळा नंबर बस थांब्याजवळील उड्डाणपुलावर सोमवारी (दि.13) सकाळी ऑईल सांडल्याने दुचाकी घसरुन पडू लागल्या. याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासाच्या परिश्रमानंतर हा रस्ता धुवून साफ केला. त्यानंतर या रस्त्यावरुन वाहतूक पुर्ववत सुरु झाली.
डांगे चौक मार्गे जगताप डेअरी, औंध तर औंधकडून डांगे चौक, वाकड, चिंचवडकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता सोळा नंबर बस थांब्याजवळ भुयारी मार्ग व उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. या पुलावर सोमवारी पहाटे एका वाहनातून सुमारे किलोमीटर अंतरावर ऑईलची गळती झाली होती. त्यामुळे अनेक दुचाकी वाहने घसरुन पडत होती. याची माहिती मिळताच महापालिकेच्या रहाटणी अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद केली. त्यानंतर या उड्डाणपुलावर सांडलेले ऑइल धुवून काढले. सकाळी सात ते आठ असे सुमारे एक तास हे काम सुरु होते. सांडलेले सर्व ऑईल धुवून काढल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. रहाटणी अग्निशमन दलाच्या भगवान यमगर, नामदेव वाघे, जयराम कदम, शाहू वनमाने आणि मारुती गुजर यांनी हे ऑईल धुवून घेतले.
व्हीएस न्यूज - महिला सहकारी कर्मचाऱ्याशी अश्लील बोलून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी, तसेच वाहतूक शाखेच्या प्रशिक्षण शिबिरास अनुपस्थित राहून त्याबाबत अधिकाऱ्यांना बेजबाबदार आणि बेशिस्तपणे उत्तर देणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
संपत ज्ञानदेव नागरगोजे असे निलंबनाची कारवाई झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. करण्यात आलेले आहे. काही कारणास्तव पुण्यातून 15 दिवसांपूर्वी चिंचवड वाहतूक शाखेत करण्यात आलेली होती. दरम्यानच्या काळात नागरगोजे याच्या विरोधात त्याच्या सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे अर्ज करून महिला पोलिसाकडे वाईट नजरेने पाहून, अश्लील बोलून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार दिली होती. तसेच शिवाजीनगर मुख्यालयात वाहतूक कवायत आणि वाहतूक नियमनाबाबतचे महत्त्वाचे प्रशिक्षण आयोजित केले होते.
यासाठी चिंचवड विभागाने नागरगोजे यांची निवड केली होती. मात्र, ते प्रशिक्षणास उपस्थित झाले नाहीत. या प्रकरणाची प्राथमिक आणि विभागीय चौकशी करण्यात आली. प्रशिक्षणास उपस्थित नसल्याबद्दल नागरगोजे यांना वरिष्ठांनी विचारणा केली असता त्यांनी बेजाबदार आणि बेशिस्त उत्तरे दिली. हा प्रकार पोलीस खात्याच्या शिस्तीत बसत नाही, असा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगावचा रस्त्याचा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कागदावर राहिले होते. परंतु, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्ली दरबारी जाऊन उड्डाणपुलाला लष्कराची जागा मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. लष्कराने उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. त्याबाबत संरक्षण मंत्रालयाने आमदार जगताप यांना पत्राद्वारे कळविले आहे.
बापखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी “सीएमई’च्या हद्दीतील रस्त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे बोपखेलमधील ग्रामस्थांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाणे सोईचे ठरत होते. मात्र, उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्कराने 2015 मध्ये सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. हा रस्ता पूर्ववत सुरू करावा, यासाठी बोपखेलकरांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली. त्याला लष्कराने कोणतीही दाद न देता सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता कायमचाच बंद करून टाकला. तसेच बोपखेलवासीयांची गैरसोय दूर करण्यासाठी मुळा नदीवर बोपखेल ते खडकीला जोडणारा तात्पुरता तरंगता पूल सुरू केला. मात्र, हा तात्पुरता तरंगता पूल तात्पुरताच ठरला. त्यामुळे बोपखेलवासीयांना सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटरचा वेढा पडत आहे. बोपखेलमधून पुढे खडकीत 512 येथे निघणारा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळा नदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात खर्चाची तरतूदही करण्यात आली. मात्र खडकीच्या दारूगोळा कारखान्याच्या आसपास निघणाऱ्या या रस्त्यासाठी लष्कराचे ना-हरकत प्रमाणपत्र व उड्डाणपुलासाठी जागा मिळत नसल्याने बोपखेल आणि खडकी दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल आजतागायत कागदावरच राहिला आहे.
भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी यांनी उड्डाणपूल व रस्त्यासाठी लष्कराने ना-हरकत प्रमाणपत्र आणि आवश्यक जागा द्यावी, यासाठी अनेकदा दिल्ली दरबारी जाऊन प्रयत्न केले. तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरूण जेटली आणि विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सितारमन तसेच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आहे. लष्कराने बोपखेल आणि खडकी दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला आवश्यक जागा हस्तांतर करण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केल्याचे संरक्षण मंत्रालयाने आमदार जगताप यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्याबाबत संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मनीष ठाकूर यांनी हे पत्र पाठविले आहे. त्यामुळे बोपखेल आणि खडकीला जोडणारा उड्डाणपूल उभारण्याचा लष्कराचा अडथळा लवकरच दूर होणार आहे.
व्हीएस न्यूज - दिल्ली येथील संसद भवन रोडवर ऑल इंडिया टिचर्स फेडरेशन व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी ऑल इंडिया टिचर्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रभाकर आरडे, महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष श्रीराम परबत, सरचिटणीस प्रभाकर बागुल, चिटणीस सुधाकर सावंत आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी केंद्रीय शिक्षकांप्रमाणे राज्यातीत शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी, सेवानिवृत शिक्षकांना केंद्राप्रमाणे पेन्शन मिळावी, केंद्रीय शाळेप्रमाणे राज्यातील शाळांना मोफत शिक्षण देण्यात यावे, सर्वांना पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, आदी विविध मागण्यांसाठी देशभरातील प्राथमिक शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
व्हीएस न्यूज - त्वरित चाचणी करुन रोग निदान करण्याच्या हेतूने ठाणे येथील भारतीय बनावटीचे वैद्यकिय चाचणी उपकरणे निर्मीत करणाऱ्या बायोसेन्स टेक्नोलॉजी कंपनीने विकसीत केलेले मशिन महापालिकेच्या रुग्णालय व दवाखाण्यासाठी खरेदी केल्यास नागरिकांना लॅब मध्ये जाण्याची आवश्यकता लागणार नसून त्यामुळे वेळ व खर्च वाचेल, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले. बुधवार दि. ०८ नोव्हेंबर २०१७ रोजी महापौर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास आरोग्य वैद्याकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी आदी उपस्थित होते. बायोसेन्स टेक्नोलॉजी द्वारे उत्पादीत सर्व वैद्यकीय उपकरणे ही त्वरीत चाचणी करुन रोग निदान करण्याच्या हेतूने विकसीत व निर्माण करण्यात आले असल्याचे यावेळी महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. बायोसेन्स टेक्नोलॉजी ही ठाणे स्थाईक डॉक्टर्स आणि आय.आय.टी इंजिनियर्स द्वारा स्थापित भारतीय बनावटीचे वैद्यकीय चाचणीउपकरणे निर्मीत करणारी कंपनी आहे. या कंपनीचे प्रतिनिधी डॉ. अभिषेक सेन, डॉ.अनुराग श्रीवास्तव, जितेंद्र सोनार यांनी महापौर नितीन काळजे यांना त्यांचे कार्यालयात सदर मशिनद्वारे करण्यात येणा-या विविध चाचण्यांचे (तपासणी) प्रात्यक्षिक दाखविले. या कंपनी द्वारा विकसीत केलेल्या Remote Dignostic Kit च्या सहाय्याने विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या, जसे हिमोग्लोबीन चाचणी ( शरिराला इजा न करता) युरीन (रुटीन), मलेरीया,डेंग्यू, चिकन गुनिया, युरीनरी प्रेग्नंसी, रक्त शर्करा, रक्त दाब, ऑक्सीजन संपृक्तता इत्यादी चाचण्या केल्या जातात.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002