व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली असून यावर्षी 100 टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ठये असल्याचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले. यावर्षी घरपट्टीची एकूण मागणी 16 कोटी 44 लाख रुपये तर पाणी पट्टीची एकूण मागणी 5 कोटी 10 लाख रुपये आहे. आतापर्यंत 8 कोटी 54 लाख तर पाणीपट्टी पोटी 1 कोटी 55 लाख रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती कर संकलन अधिकारी विजय भालेराव यांनी सांगितले. शहरात एकूण 28 हजार मालमत्ताधारक असून 16 हजार नळ जोड आहेत. कर वसुलीसाठी नगरपरिषदेकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहराचे एकूण आठ विभाग करण्यात आलेले आहे. या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी वर्ग देण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले. करनिरीक्षक भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली करवसुली अधिकारी संभाजी भेगडे, सुनील कदम, प्रवीण माने, तुकाराम मोरमारे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, विशाल लोणारी, आदेश गरुड विशेष प्रयत्नशील आहेत. सर्व मालमत्ता धारकांना घरपट्टी आणि पाणी पट्टी बिलांचे वाटप करण्यात आलेले असून मोठ्या थकबाकी दारांची विशेष यादी तयार करण्यात आलेली त्याचे साठीचे जप्ती वॉरट तयार करून संबधिताना बजवण्यात आले असल्याचे भालेराव आणि आवारे यांनी सांगितले. नागरिकांनी आपआपले कर येत्या मार्चअखेर पूर्ण भरून विकासाच्या कामात योगदान द्यावे असे आवाहन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके आणि सर्व नगरसेवकांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - जुनी सांगवी ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन ढोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान ग्रामदैवत श्री वेताळ महाराजांचा उत्सव विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावर्षी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तने, भजने, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर असे अखंड हरिनाम सप्ताह तसेच पालखी व काटी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 26 मार्च पर्यंत करण्यात आले असल्याचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज ढोरे यांनी कळविले आहे. उत्सव समिती पुढीलप्रमाणे : अध्यक्ष -सचिन ढोरे, उपाध्यक्ष- लालिदास ढोरे, खजिनदार -राजेंद्र ढोरे, किरण पाले, सेक्रेटरी-राजेंद्र शितोळे, सुभाष ढोरे, शिवाजी ढोरे, कार्याध्यक्ष-जनार्धन पवार, प्रकाश ढोरे, चेतन ढोरे, क्रियाशील सदस्य- खंडूजी किसान ढोरे, अतुल ढोरे, गणेश सुभाष ढोरे, सनी पांडुरंग शितोळे, सतपाल ढोरे, गणेश ढोरे, सल्लागार - अशोक ढोरे-पाटील, विजय बाप्पू ढोरे, सिकंदर अण्णा पोंगडे, युवराजसिंह गायकवाड, राजू कड, चंद्रकांत ढोरे, गोटीराम ढमाले, बबन नथु ढोरे, वर्गणी प्रमुख-शाहरुख सय्यद, अजिंक्य सुभाष ढोरे, अभिजित गोवर्धन ढोरे, अमित रमेश ढोरे, प्रशांत ढोरे, अविनाश पोंगडे, राहुल माकर, भूषण हांडे, नितीन गोटे, अक्षय चव्हाण, सुनील बा. कांबळे, गणेश वाळुंज, भावड्या धापटे, मुकुंद शिंदे, ईश्वर पाटील, गणेश वाळुंज यांचा सहभाग आहे.
व्हीएस न्यूज - खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजे राष्ट्रवादीतून जरी निवडून आलेले असले तरी ते म्हणजे एक मुक्त विद्यापीठ आहे, या विद्यापीठाचे नियमही तेच बनवतात आणि नियम मोडणाऱ्यांना शासनही तेच करतात, असे धक्कादायक विधान केले. लोकशाही शासनप्रणालीत राज्याच्या प्रमुखाने अशा प्रकारे कुणाचीही मखलाशी करणे हे धक्कादायक असल्याचे मत काळेवाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्याल, रूग्णालयाच्या वतीने महिलांसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 ते 10 मार्च या कालावधीत हे शिबीर होणार आहे. यामध्ये महिलांच्या पाळीच्या तक्रारी, वंधत्व चिकित्सा, स्त्रीयांचे इतर आजार, गर्भाशय, स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे, या शिबीरामध्ये जास्तीत-जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
+व्हीएस न्यूज - श्री तुकाराम महाराज बीजेनिमित्त येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच तुका झालासे कळस या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बीजेनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात उद्योजक संतोष खांडगे यांचे हस्ते श्री पांडुरंगाची महापूजा आणि तुकाराम महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी काकड आरती, भजन आणि अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला. अभंगवाणी कार्यक्रमात संगीत विशारद हभप गणेश महाराज मोहिते यांना तुकाराम महाराजांचे अभंग सादर केले. हभप सुखदेव महाराज ठाकर यांनी निवेदन केले. तबल्याची साथ हभप गोरखनाथ कोकाटे, सचिन इंगळे यांनी प्रदीप कुडेकर, ओंकार मोहिते, सुबोध साठे, भाऊ हुलावळे यांनी संगीत साथ दिली. खांडगे यांचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हभप ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, सेवेकरी आप्पा शिरुरे, विठ्ठल दरेकर यांनी परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज - पिंपळे सौदागर येथे ज्येष्ठ नागरिकाला अंगावर घाण पडली आहे असे सांगून त्याचे लक्ष विचलित करत चोरट्याने 50 हजार रुपये असलेली पिशवी पळवून नेली. ही घटना शनिवारी पिंपळे सौदागर येथे घडली. याबाबत पंढरीनाथ वाघ (वय 65, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघ हे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रोडवर असलेल्या चहाच्या टपरीजवळून पायी जात होते. अचानक एका अंदाजे 45 वर्षाच्या रंगाने सावळ्या, अंगावर निळी जीन्स व पांढरा टीशर्ट घातलेल्या एका इसमाने त्यांना थांबवले व वाघ यांना त्यांच्या अंगावर वरून घाण पडली असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित झाले. याचा फायदा घेऊन त्या इसमाने वाघ यांच्याकडे असलेली पिशवी हिसका देऊन पळवून नेली. पिशवीमध्ये 50 हजार रुपये रोख व महत्वाची कागदपत्रे होती. फौजदार एम टी शिंदे अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - कंपनीच्या माध्यमातून काम करताना गुणवत्तेमध्ये सुधारणा, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता, उत्पादक वाढीसाठी प्रयत्न करणे आदी गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पंतप्रधान श्रम पुरस्काराने टाटा मोटर्समधील पाच कामगारांचा नुकताच दिल्ली येथे गौरव करण्यात आला. दिल्लीतील विज्ञान भवन येथे 26 जानेवारी रोजी भारताचे उपराष्ट्रपती वैकंय्या नायडु यांच्या हस्ते टाटा मोटर्समधील कर्मचारी राजेंद्र राजाराम निंबाळकर, राकेश भास्कर देशमुख, डॉ. वसंत गंगाधर भांदुर्गे, कैलास विठ्ठल माळी, मनोजकुमार विठ्ठल आणेकर यांना पंतप्रधान श्रम पुरस्कार व मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय श्रम रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार उपस्थित होते.
व्हीस न्यूज - आपल्या देशात होणारे आर्थिक परिवर्तन पाहता 2030 पर्यंत भारत हा जगात आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास चिरुपल्ली येथील आय.आय. एमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी व्यक्त केला. चऱ्होली येथील डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट व स्कूल ऑफ एमसीए आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त "समकालीन धोरण: जागतिक दृष्टिकोन" या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी केबांग्सन मलेशिया विद्यापीठाचे विशेष अतिथी डॉ. जॉन अंतोनी झेवियर, कॅनडा देशाचे डॉ कृष्ण लाल, श्रीलंकेचे डॉ अशोका जीनादासा व आरोषा जयसुंदरा, बांगलादेशाचे डॉ सैफुल मजीद, जाफना विद्यापीठ श्रीलंकेचे डॉ बी निमालाथासन, अन्नामलाई विद्यापीठ तामिळनाडूचे डॉ एस. पंचानाथम, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते. डॉ. मेत्री पुढे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्पादनचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. देशातील काही उद्योग चुकीच्या धोरणामुळे लोप पावत आहे. अडचणीत सापडलेल्या उद्योजकांनी आत्मपरीक्षण करून विकास साधला पाहिजे. जागतिक औद्योगिक क्रांतीचे चार टप्पे समजावून सांगत असताना डॉ कृष्णलाल, कॅनडा म्हणाले की सध्याची औद्योगिक क्रांती हि चौथी आहे. तसेच त्यांनी उद्योग व्यवसाय हा मानवी जीवनाशी व पारंपारिक अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. तसेच त्यांनी भारत व कॅनडा या देशाच्या अर्थव्यवस्थेची तुलना करताना म्हणाले की, कॅनडा मध्ये आरोग्यावर 10.9 टक्के तर शिक्षणावर 6 टक्के खर्च केला जातो व 12 वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. तसेच भारतामध्ये आरोग्यावर 4 टक्के तर शिक्षणावर 3 टक्के पेक्षाही कमी खर्च केला जातो. कुलगुरू डॉ खेडकर म्हणाले की, औद्योगिक क्रांतीमुळे औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आले आहेत. परिणामी जागतिक स्पर्धा वाढली, नव्याने विकास क्षेत्र निर्माण झाले व कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले. तसेच देशाच्या आर्थिक विकासदरात वाढ झाली. औद्योगिक क्षेत्राचा विकास साधण्यासाठी कार्यक्षमता, लवचिकता, ध्येय, प्रतिभा, मूल्यसंवर्धन व शाश्वत या सहा सूत्रांचा वापर केला पाहिजे. सूत्रसंचालन डॉ. श्रीकला बच्छाव तर आभार डॉ ओ पी हलदार यांनी मानले.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका डॉ. कमरुन्निसा माजिद खान यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. करमरुन्निसा या राष्ट्रवादीकडून खराळवाडी येथून (2002 ते 2007) निवडून आल्या होत्या. तसेच त्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती देखील होत्या. त्यांचा नेहरुनगर येथील कबरस्तानात सोमवारी दफनविधी करण्यात आला.
व्हीएस न्यूज - हिंदू धर्मियांनी 2014 मध्ये मोठ्या आशेने भाजपकडे सत्ता सोपवली. मात्र, मोदी सरकार मुस्लिम धर्मियांचे लांगुलचालन करण्यात दंग आहे. 28 वर्षांपूर्वी आम्ही काश्मिरमधून विस्थापीत झालो. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काश्मिरमध्ये जाता येईल, असे वाटले होते. परंतु, ही आशा फोल ठरली. हुरियत सारख्या फुटीरतावाद्यांशी काश्मिर मधील पीडीपी-भाजप सरकार जवळीक साधत आहे. त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. मोदी सरकार राष्ट्रवादी नसून धृतराष्ट्रवादी आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काश्मिरी विचारवंत सुशिल पंडित यांनी केली. रहाटणी येथील हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिन आणि शिवजयंती महोत्सवाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंडित यांना 'हिंदू कुलभूषण पुरस्कार- 2018' प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पंडित यांनी काश्मिर प्रश्न आणि देशापुढील इतर अनेक प्रश्न यावर आपले सडेतोड विचार व्यक्त केले. कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयातील वकील ऍड. संजिव पुनाळेकर, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक पंडित धर्मवीर आर्य, कार्यक्रमाचे समन्वयक नगरसेवक कैलास बारणे, माजी नगरसेवक कुमार जाधव, प्रतिष्ठानचे सचिव उत्तम दंडिमे, जगदिश वासवानी, अतुल आचार्य, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभूवन, संस्थेचे विश्वस्त सुहास पोफळे आदी उपस्थित होते. पंडित पुढे म्हणाले की, काश्मिर ही शिवशंकराची भूमी असून हिंदू धर्मियांमध्ये या भूमीस अनन्य साधारण महत्त्व आहे. पतंजलिंनी योग विद्येविषयीचे शिक्षण येथेच लिहिले. काश्मिर हे ज्ञानाचे-आस्थेचे केंद्र आहे. आदी शंकराचार्य तपश्चर्यसाठी केरळमधून काश्मिरमध्ये आले होते. बौध्दांनी सहा महिने चिंतन-मनन केल्यानंतर महायानची स्थापना येथेच केली. असे हे काश्मिर सध्या धुमसते आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणाऱ्या अनेक हिंदू कुटुंबांवर अन्यायऱ्अत्याचार, महिलांवर बलात्कार केले. अशा घटनांमुळे येथील हिंदू कुटुंबांना विस्थापीत व्हावे लागले. केवळ दहा ते पंधरा टक्के हिंदू काश्मिरमध्ये वास्तव्यास आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर आम्हाला परत काश्मिरमध्ये जाता येईल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. हिंदुस्थानमध्ये असे होत असेल तर येथील माणूस सुरक्षित नाही, असेच म्हणाले लागेल, असे पंडित म्हणाले. मानपत्र वाचन ऍड. देविदास शिंदे, स्वागत पंडित धर्मवीर आर्य यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम दंडिमे यांनी तर आभार सुहास पोफळे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - कंपनीतील डिझेल फ्युअल इंजेक्टर चोरणाऱ्या एका कामगाराला अटक करण्यात आली आहे. किरण पांडुरंग शिंदे (वय 19, रा. केळगाव, आळंदी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सोन्नप्पा देशमुख (वय-58, रा. लोहगाव, पुणे) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण शिंदे टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी डिव्हिजन मध्ये काम करतो. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दुसरी शिफ्ट संपवून घरी जात होता. किरण पिशीवून काही घेवून जात असल्याच्या संशयावरून कंपनीतील सुरक्षारक्षक सोनप्पा देशमुख यांनी त्याला हटकले. व त्याची पिशवी तपासली असता त्यामध्ये कंपनीतील सुमारे 24 हजार रुपयांचे 12 डिझेल फ्युअल इंजेक्टर होते. फौजदार श्रीकांत शेंडगे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - बेपत्ता तरुणाचा मृतदेह ओटा स्किम येथे एका इंडिका मोटारीमध्ये आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. राहुल खुळे (रा. ओटा स्कीम, निगडी), असे मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा शनिवारपासून बेपत्ता होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील ओटा स्कीम येथे सोमवारी सकाळी एका इंडिका मोटारीत मृतदेह असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राहूल शनिवारपासून बेपत्ता होता. राहूलचा खून झाला आहे की आत्महत्या केली आहे याचा शोध घेण्यात येईल, असे पोलीसांनी सांगितले. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002