व्हीएस न्यूज - सध्याच्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे, असे मत उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले.
‘‘दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी होईल, असा आत्मविश्वास आम्हाला आहे. या दौऱ्यात जर आम्ही लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर आम्हाला पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता येईल. आम्ही या आव्हानासाठी सज्ज आहोत. आमच्यासाठी प्रत्येक सत्र महत्वाचे असेल. प्रत्येक सत्रानुरुप आम्ही खेळ करू,’’ असे अजिंक्य म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाबत अजिंक्य म्हणाला की, ‘‘दक्षिण आफ्रिकेचा संघ हा चांगलाच समतोल आहे. त्यांच्याकडे सातत्याने वेगवान मारा करणारे गोलंदाज आहेत. त्यामुळे या दौऱ्यात कोणत्याही क्षणी आम्ही गाफिल राहणार नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना हा महत्वाचा असेल.’’
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर एकही सराव सामना खेळायला मिळणार नाही. पण भारतीय संघ व्यवस्थापनाने फलंदाजांना चांगला सराव मिळावा म्हणून अतिरीक्त गोलंदाज या दौऱ्यासाठी नेले आहेत. या निर्णयाचे कौतुक अजिंक्यने केले आहे. तो म्हणाला, ‘‘संघ व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे आम्हाला चांगला फलंदाजीचा सराव करता येणार आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या शैलीत वेगळेपणा आहे आणि त्याचाच फायदा आम्हाला सरावादरम्यान नक्कीच होणार आहे.’’
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002