व्हीएस न्यूज - काही अनपेक्षित बदल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत केल्यामुळे कर्णधार विराट कोहली दिग्गजांच्या निशाण्यावर आला आहे. अंतिम अकरा जणांमधून भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनला वगळल्याने जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आता विराटवर टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही निशाणा साधला आहे.
जर चांगली कामगिरी सेन्चुरियनमधील ‘करो या मरो’ कसोटीत करण्यात विराट कोहली अपयशी ठरला तर त्याने स्वतःलाही अंतिम अकरा जणांमधून वगळावे, असे सेहवागने म्हटले आहे. शिखर धवन केवळ एकाच कसोटीत अपयशी ठरला होता आणि भुवनेश्वरला वगळण्याचे काहीही कारण नसल्यामुळे आता या कसोटीत विराट अपयशी ठरला तर त्याने पुढच्या कसोटीत खेळू नये, असे सेहवागने म्हटले आहे.
भुवनेश्वर कुमारला वगळणे हा अत्यंत चुकीचा निर्णय होता. इशांत शर्माला उसळत्या गोलंदाजीसाठी त्याच्या उंचीचा फायदा होईल. मात्र विराटने भुवनेश्वरच्या आत्मविश्वासालाही धक्का पोहोचवला आहे, असे म्हणत सेहवागने विराटवर निशाणा साधला आहे. इशांत शर्माला इतर गोलंदाजांच्या जागी संघ व्यवस्थापनाने खेळवणे अपेक्षित होते. मात्र केपटाऊनमध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरला वगळण्याचा निर्णय चुकला, असे सेहवागने स्पष्ट केले.